कायद्याचे उल्लंघन : जनजागृतीचा अभाव अन् पैशाची गरज कारणीभूतरवी जवळे ल्ल चंद्रपूरचंद्रपूर: सध्या महागाईच्या युगात कुटुंब प्रमुखांचे राबणे अनेक ठिकाणी उदरनिर्वाहासाठी पुरसे ठरत नाही. थोडेफार काम केल्याने काय होते, असा समज, यामुळे कायदा असूनही अनेक प्रतिष्ठानात व लघुउद्योगात आजही बालमजूर राबताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बालमजुरांची आकडेवारी शासनदरबारी नसली तरी हजारो शाळाबाह्य मुले चाकरी करताना दिसूृन येतात.१२ जून रोजी जागतिक बाल कामगार दिन पाळला जात आहे. या पार्श्वभूमिवर ‘लोकमत’ने आज बुधवारी चंद्रपूर शहराचा फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी उन्हाची तिव्रता सहन करीत बालमजूर राबताना दिसून आले. १९४८ पासूनच बालमजुरांसाठी कायदा अस्तित्वात आला. पुढे या संदर्भात अनेक कायदे आले. मात्र अद्यापही या कायद्यांचे पालन होताना दिसून येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात जवळजवळ ३० टक्के लोक दारिद्ररेषेखाली जीवन जगतात. त्यांच्या घरातील आई-वडील हे दोघेही कुटुंब प्रमुख मोलमजुरी करतात. काही वेळा तर त्यांच्या हाताला कामही मिळत नाही. याशिवाय सध्याच्या महागाईच्या युगात त्यांना मिळणाऱ्या मजुरीतून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. अशावेळी १२ ते १४ वर्षाच्या मुलांना कामावर लावले जाते. एकदा का मुलगा चाकरी करायला लागला की त्याचे बालपण त्याचवेळी करपते. तो पुन्हा बाल्यावस्थेत परत येत नाही. विविध बांधकामात, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, वर्कशॉप, मोटर गॅरेज, शेतकाम, विटभट्टी, भाजीपाला दुकाने, किराणा व्यवसाय, जनरल स्टोअर्स, कपड्यांची दुकाने आदी प्रतिष्ठानांसह अनेक लघु उद्योगातही बालकामगारांना कामावर घेतले जाते. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी मुलांना साधी ‘एंट्री’ही नाही, अशा बिअरबार व दारू दुकानातही बालकामगार राबताना दिसत आहेत. बालकामगाराला कमी मजुरी दिली तरी चालते, या भावनेतून प्रतिष्ठानाचे मालकही त्याला सर्रास कामावर घेतात. प्रारंभी या बालकामगारांना हलकी कामे दिली जातात. त्यानंतर सराव होताच जड कामेही करवून घेतली जातात. शहराच्या गल्लीबोळात बालकामगार राबत असल्याचे दिसून येत असतानाही कामगार आयुक्तांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. एखाद्याने तक्रार केलीच तर कारवाई केली जाते. प्रतिष्ठान मालकांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. अशा कारवाया चंद्रपूर जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतक्या झाल्या आहेत. वास्तविक याबाबत कामगार आयुक्त, महिला व बालकल्याण, बाल विकास प्रकल्प आदींनी संयुक्तपणे याबाबत प्रभावी जनजागृती करणे आवश्यक आहे. कारण जनजागृतीचा अभाव आणि महागाईत पैशाची गरज यातूनच बालमजूर समाजात अस्तित्वात आला आहे.
खुलेआम राबविले जाताहेत बालमजूर
By admin | Updated: June 11, 2014 23:48 IST