आर्द्रता वाढली : तापमानात तात्पुरती घटचंद्रपूर : दक्षिणेकडे निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे विदर्भातील आर्द्रता कमालीची वाढली आहे. चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आज बुधवारी तापमानात घट झाली असली तरी ढगाळ वातावरण आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. दिवसभरच उकाडा कायम राहिला. त्यामुळे घामाने चिंब भिजत असलेले नागरिक वैतागल्याचे दिसून आले. चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा सर्वांनाच ठाऊक आहे आणि नकोसा वाटणारा आहे. दरवर्षीच मे महिन्यात सुर्याचा प्रकोप जिल्हावासीयांना पाहायला मिळतो. यावर्षी उन्हाळ्याची चाहुल जरा उशिरानेच लागली. त्यातही अनेकवेळा अकाली पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत तापमान वाढत असल्याचे जाणवले नाही. मात्र त्यानंतर उन्हाची काहिली असह्य होऊ लागली. एप्रिल महिन्याच्या अखेर व मे महिन्याच्या प्रारंभी कडक उन्हाळा सुरू झाला. अशातच मागील तीन-चार दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. चंद्रपुरातील नागरिक गेल्या तीन ते चार दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघत आहेत. शनिवारी चंद्रपुरात तब्बल ४६ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान यावर्षीचे सर्वाधिक तापमान ठरले असून राज्यातही चंद्रपूर जिल्ह्याचे शनिवारचे तापमान सर्वाधिक ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली होती. वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून जनजीवनच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील अनेक रस्ते निर्मनुष्य दिसून येतात. ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र असताना मे महिन्यात तसे अनुभवायला मिळाले आहे. मे महिन्याचा आठवडा लोटल्यानंतर सूर्याने आग ओकणे सुरू केले असून मेच्या पहिल्या आठवड्यात चंद्रपूरचे ४५ अंशापर्यंत पोहचले होते. या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असाह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत असल्याने नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, हे विशेष.दरम्यान, आज बुधवारी चंद्रपुरात ४४.० अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमानात मागील चार दिवसांच्या तुलनेत घट झाली असली तरी आज संपूर्ण जिल्ह्यातच वातावरण विचित्र होते. दक्षिणेकडे चक्रीवादाळाची स्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्याच्या वातावरणातील आर्द्रता वाढल्याचे ग्रिन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष व खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या प्रकारामुळे बुधवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा होता. साधे झाडाचे पानही कुठे हलताना दिसत नव्हते. ढगाळ वातावरण असले तरी उकाड्यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले. कामे करताना प्रत्येकजण घामाने चिंब होताना दिसून आले. पंखे किंवा कुलर लावूनही उकाडा कमी होत नव्हता. उकाड्यापेक्षा उन्ह बरे असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली होती. (शहर प्रतिनिधी)
उकाड्यामुळे चंद्रपूरकर हैराण
By admin | Updated: May 19, 2016 00:40 IST