सूर्यनारायण कोपलाचंद्रपूर : ‘हॉट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरातील नागरिक गेल्या तीन ते चार दिवसांपासून अक्षरश: होरपळून निघत आहेत. शनिवारी चंद्रपुरात तब्बल ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान यावर्षीचे सर्वाधिक तापमान ठरले असून राज्यातही चंद्रपूर जिल्ह्याचे शनिवारचे तापमान सर्वाधिक ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांनी धसका घेतला असून जनजीवनच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील अनेक रस्ते निर्मनुष्य दिसून येतात. ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातच होत असते. यंदाही चंद्रपूर जिल्ह्याची ही ओळख कायमच राहणार, असे चित्र असताना मे महिन्यात तसे अनुभवायला मिळाले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसू लागतात, असा अनुभव दरवर्षीच नागरिकांना येतो. मात्र यावेळी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचे तापमान कमी होते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल यावर्षी उशिराने लागली. मात्र अवकाळी पावसाचा गारवा फार काळ टिकला नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊन्ह तापू लागले. एप्रिल महिना लागताच सूर्याने प्रकोप दाखविणे सुरू केले. तर या महिन्यातही काही दिवस अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मे महिन्याचा आठवडा लोटल्यानंतर सूर्याने आग ओकणे सुरू केले असून गुरुवार व शुक्रवारी चंद्रपूरचे ४५ अंशाच्यावर होते.या वाढत्या उष्णतामानामुळे जवजीवनावरच परिणाम झाला आहे. सकाळी ९ वाजतापासून उन्हाचे चटके असाह्य होऊ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. सध्या काही शाळा-महाविद्यलयांनाही सुट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात निरव शांतता पसरल्याचे दिसून येत असल्याने नागरिक सायंकाळीच बाहेर निघणे पसंत करीत आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी आतापर्यंत चार जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. नागरिकांनी उन्हाचा चांगलाच धसका घेतला असून जिल्ह्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी वर्तविली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)प्रशासनाने दिला अतिदक्षतेचा इशारा विदर्भामध्ये १२ ते १६ मे पर्यंत उष्णतेची संभाव्य लाट निर्माण होऊन ती ३१ मे पर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी वृद्ध व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी दक्षता बाळगून स्वत:चा बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ३१ मे पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण लहरींचा प्रकोप राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:चा उन्हापासून बचाव करावा आणि शक्यतो उन्हात बाहेर पडणे टाळावे. - डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी, चंद्रपूर.आकस्मिक आरोग्य सेवा उपलब्धतीव्र उन्हामुळे अनेकांना अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे आढळून आल्यास थंडगार पाण्याने आंघोळ करावी. जास्तच त्रास झाल्यास १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच मनपाच्या आरोग्य केंद्रात आकस्मीक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.पाणी स्रोत आटल्याने संघर्ष वाढलायंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जलाशय, नदी, तलाव-बोड्यात पाणी साठले नाही. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक हातपंप बंद आहेत. विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. एका गावातील एकाच विहिरीवर दोन गावातील गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना नसल्याने असंतोष पसरला आहे.
चंद्रपूर हॉट
By admin | Updated: May 15, 2016 00:34 IST