चिमूरच्या कोंडवाड्याची दुरवस्था : प्रशासनाप्रति नागरिकांत असंतोषचिमूर : नव्यानेच स्थापन झालेल्या चिमूर नगर परिषद क्षेत्रातील कोंडवाड्याची दुरवस्था झाली असून कोंडवाड्यातील जनावरांकडे दुर्लक्ष केले जात आहे. १९ जुलैला गोहत्या करण्यासाठी जात असताना जागरुक युवकांनी जनावरे पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्यावर कोंडवाड्यात टाकण्यात आले. परंतु कोंडवाड्याची दयनीय अवस्था असल्याने जनावरांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सामाजीक कार्यकर्ते विनोद शर्मा यांनी जनावरे चक्क नगर परिषद कार्यालयात आणून राग व्यक्त केला.ब्रह्मपुरी तालुक्यातून ट्रकमधून जनावरे कत्तलखान्यात जात असताना येथील जागरुक युवकांनी पाठलाग करुन ट्रक पकडला. ती जनावरे पोलिसांच्या स्वाधीन केली. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ७ आॅगस्टला सुपूर्तनाम्यावर जनावरे सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. उज्वल गोरक्षण शाळा चंद्रपूर वतीने विनोद शर्मा यांनी ३१ हजार ५०० रुपयाचा दंड नगर परिषदमध्ये भरणा केल्यावर जनावरे सोडण्यात आली. परंतु नगर परिषद मधील कोंडवाड्यात सोयीसुविधा नसून जनावरांना चिखलातच रहावे लागते. जनावरांकडे लक्ष देण्यात येत नसून चारा टाकल्यात जात नसल्याचेही दिसून आले. याकडे येथील प्रशासकाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासकांना वारंवार सांगूनही याकडे डोळेझाक करीत असल्याने नगर परिषद स्तरावर प्रती जनावरांना दंड आकारत असताना त्या जनावरांना योग्य जागा, चारा तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी न करणे, पाण्याचा टाका असूनसुद्धा पाणी न भरणे असे प्रकार सुरू आहेत. या प्रकाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी उज्वल गोरक्षण शाळा चंद्रपूरचे चिमूर तालुका प्रभारी विनोद शर्मा यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
जनावरांना घेऊन पालिकेत धडक
By admin | Updated: August 10, 2015 00:36 IST