वनोजा गावात आनंद : शेतकऱ्यांनी केले पाणीपूजनवरोरा : कॅनलसाठी अत्यल्प किंमतीत जमीनी दिल्या. कॅनलमधून पाणी येईल व आपल्या जमीनी सिंचीत होणार अशी आशा बाळगून असणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न तब्बल वीस वर्षानंतर पूर्ण झाले आहे. कॅनलचे पाणी आल्याने वनोजावासियांनी गावातून भजन दिंडी काढून कालव्यावर पाणीपूजन केले. यावेळी पाणी बघून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.वर्धा जिल्ह्यातील लाल पोथरा धरणातील पाणी वरोरा तालुक्यातील तीस गावातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मिळणार असून हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. वीस वर्षापूर्वी वरोरा तालुक्यातील वनोजा गावातील शेतकऱ्यांनी अत्यल्प मोबदल्यात कालव्याकरिता जमिनी दिल्या. काहींच्या शेताचे कालव्यामुळे दोन तुकडेही पडले. परंतु, त्याचीही शेतकऱ्यांनी पर्वा केली नाही. मोबदला जरी कमी मिळाला परंतु, दुबार पीक घेण्याकरिता पाणी मिळेल व आर्थिक पोत सुधारेल, असा समज ठेवून पाण्याकरिता वीस वर्षे वनोजावासीयांनी प्रतीक्षा केली. सिंचनाकरिता पाणी द्यावे याकरिता वनोजावासियांनी लाल पोथरा संयुक्त कालवा पाणी संघर्ष समितीच्या वतीने पाटबंधारे कार्यालयात आंदोलने करून निवेदन दिली. अखेरीस या हंगामात पाणी वनोजा गावापर्यंत सोडण्यात आले आहे. त्यामुळे वनोजावासीय दुबार पीक घेण्यास सज्ज झाले आहेत. पाणी वापर संस्थेच्या कामाची पद्धत व पाण्याचे महत्व कळावे याकरिता वनोजावासीयांनी आज प्रथमच कालव्यात आलेल्या पाण्याचे पूजन केले. गावातून भजन मंडळीच्या वतीने पाणीदिंडी काढण्यात आली व कालव्यावर जावून पाणी पूजन केले. यावेळी लाल व पोथरा कालवा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मांडवकर, उपाध्यक्ष कमलाकर मत्ते, सचिव यशवंत सायरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवले, उपविभागीय अभियंता घागी, वाकडे, बोबडे व वनोजा गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. येत्या काही दिवसात कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेंबळ गावापर्यंत पाणी पोहचविण्याचा मानस उपस्थितांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)
२० वर्षानंतर पोहोचले कॅनलचे पाणी
By admin | Updated: December 16, 2014 22:49 IST