चंद्रपूर : जिल्ह्यात तापमानाचा पारा चढला असताना सुद्धा मे महिन्यात भरगच्च लग्न तिथीमुळे नागरिक घराबाहेर पडून नातेवाईकांच्या, मित्रांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावीत आहे. सध्या बस स्थानकासह रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. या दोन्ही ठिकाणांना यात्रचे स्वरुप आले आहे. यामुळे बसेस व रेल्वे सध्या फुल्ल आहे. सध्या सर्वत्र विवाहांची धामधूम सुरू आहे. त्यातच या महिन्यात लग्नतिथी आहे. सुटीचे दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडून लग्नसमारंभाला हजेरी लावत आहे. यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी शहर बसस्थानकात प्रवाशांनी प्रचंड गर्दी आहे. त्यातच विवाहासाठी अनेकांनी महामंडळाच्या बसेस प्रासंगिक करारावर बुक केल्याने बसेसेची संख्या कमी असल्याच्या कारणाने अनेक मार्गावरील गाड्या विलंबाने धावतात. यामुळे प्रवाशांना बराचवेळ वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत आहे. रेल्वेस्थानकावर सुद्धा बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी दिसून येते. रेल्वेच्या तिकीट खिडकीवर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या भल्यामोठय़ा रांगा लागत आहे. मात्र ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी नसल्याने सुरक्षेचा अभाव दिसून येत आहे. अतिदूर्गम आणि पहाडाळी भागामध्ये अद्यापही एसटी पोहचली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात त्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात बसेस वेळेवर पोहचत नसल्याने हा त्रासही सहन करावा लागतो. खासगी वाहनाने प्रवास करताना अनेकवेळा आसनसंख्येपेक्षा जास्त प्रवासी बसविल्या जाते, याकडे पोलिसांनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे. (नगर प्रतिनिधी)
लग्न स्थितीमुळे बसेस फुल्ल!
By admin | Updated: May 15, 2014 23:26 IST