गडचांदूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कल्याणकारी योजनांमुळे शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले असून ही बँक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.जिवती तालुक्यातील शेणगाव येथे बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिवती तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गोदरू पाटील जुमनाके होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, उपाध्यक्ष प्रभाताई वासाडे, माजी जि.प. सदस्य भिमराव मडावी, संचालक विजय बावणे, पांडुरंग जाधव, दिलीप नलगे, दामोधर मिसार, अनिल खनके, पुंडलीक कढव, नंदाताई अल्लुरवार, राजुरा उपनगराध्यक्ष अरुण धोटे, ललीत मोटघरे, मनोहर पाऊणकर, उपसभापती सुग्रीव गोतावळे, जिल्हा उपनिबंधक आर.डी. कौमडीकर, सरपंच अंजना तिरणकर, उपसरपंच शंकर कांबळे, निशिकांत सोनकांबळे, अश्पाक शेख आदी उपस्थित होते.ग्रामस्थांनी जास्तीत जास्त संख्येने बँकेत ठेवी गोळा करून बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करावी व शेतकरी, व्यापारी, बचत गट व उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्ज योजनेचा लाभ घेऊन नियमित कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले. डबघाईस आलेल्या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांचे पुनर्जिवन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शेणगाव येथील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांच्या नेतृत्वात ९१ व्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकांमध्ये आनंद होता. कार्यक्रमाचे संचालन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय खेडीकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांनी केले.यावेळी पहिल्याच दिवशी शेणगाव परिसरातील खातेदारांनी ११ लाखांच्या ठेवी जमा केल्यामुळे पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पासबुक देऊन सन्मान करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी वरदान
By admin | Updated: August 11, 2014 23:49 IST