आबीद अली यांचा आरोप : तीन करोडचे बोगस कर्ज वाटपराजुरा : बोगस सातबारा जोडून कोलामाची प्रत्येकी ८८ हजार रूपयाची तर सोसायटी गटसचिवांच्या संगनमताने तीन कोटींचे बोगस पीक कर्ज वाटप दाखवून दलालानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आबीद अली यांनी पत्रकार परिषदेत केला.विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत कमलापूर येथील आदिवासी कोलाम भीमा सुपारी कोडापे यांनी माहिती देताना सांगितले, वनसडी येथील आदिवासी सोसायटीने माझ्या नावाचे खोटे कागदपत्र तयार करुन फसवणूक केली आहे. २४ आॅगस्टला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गडचांदूर शाखेत पीक कर्जाबद्दल माहिती विचारण्यासाठी आपण गेलो असता, २९ जुलै २०१५ ला ८८ हजार ५८ रुपये माझ्या खात्यातून काढल्याची नोंद आहे. परंतु, आपण पीक कर्जाचे एक रुपयासुद्धा उचललेला नाही, असे त्यांनी सांगितले. गरीब लाचार कोलामाची थट्टा करणाऱ्या आणि गरीबाचे पैसे हडप करणाऱ्यांवर कारवाई होणार काय. कोरपना, जिवती तालुक्यात पिपर्डा, थिप्पा, दुर्गाडी, कोठोडा, जेवरा, अकोला, येरगव्हाण, कमलापूर, पारडी, वनसडी, मांडवा, कोदेपूर, मारईपाटण या सोसायट्याची चौकशी करण्याची मागणी आबीद अली यांनी यावेळी केली. काही दिवसांपूर्वी वनसडी आदिवासी सोसायटीच्या विरोधात ४५ लाखांच्या अफरातफरीची तक्रार पोलिसात झाली होती. ती चौकशी सुरू आहे, या सोसायटीचे गटसचिव हे अज्ञानाचा फायदा घेऊन आदिवासी, कोलामांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करीत आहे. जमीन नावाने नसताना बोगस सातबारा तयार करुन पीक कर्जाची उचल केली आहे. बँकेचे सोसायट्यावर नियंत्रण नसल्यामुळे पीक कर्ज वाटपात घोळ झाल्याचे आबीद अली यांनी म्हटले आहे. याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व आदिवासी कोलामांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)भ्रष्टाचार करणाऱ्याना सोडणार नाहीआपण शेतकऱ्यांच्या बाजूने असून खोटे काम करणाऱ्यांना कारागृहात टाकल्याशिवाय सोडणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. - मनोहर पाऊणकर अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक
बोगस सातबाऱ्याने कोलामांची फसवणूक
By admin | Updated: August 26, 2015 00:53 IST