खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी बॅंकेतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ३१ मार्चपर्यंत कर्ज भरण्याचा अवधी शेतकऱ्यांना असतो. त्यानंतर पुन्हा नवे कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येत असते. जो शेतकरी कर्ज भरत नाहीत, ते कर्ज थकित ठरवून त्यावर व्याज आकारणी केली जाते. भाजप सरकारने २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवली. या योजनेंतर्गत २००९ ते २०१६ पर्यंतची कर्जमुक्ती देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचे पैसे येण्यास बराच कालावधी लागला. त्यामुळे कर्ज माफ होईल, या धारणेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरलेच नाही. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारनेसुद्धा कर्जमाफी केली. त्याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना बॅंकेतर्फे नव्याने कर्ज देण्यात आले. खरीप हंगामात तर ७५५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
बॉक्स
अनेक शेतकरी योजनेपासून वंचित
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले. परंतु, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचे पुनर्गठण केले होते, त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची ओरड आहे. त्यामुळे ३१ मार्चच्या आत ज्या शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत कर्जमुक्तीसाठी अर्ज भरले होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे तसेच पुनर्गठित करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
कोट
शासनाच्या योजनेंतर्गत माझी कर्जमुक्ती झाली आणि नव्याने कर्जही मिळाले. त्यामुळे हंगामाला हातभार लागला.
समाधान लांडे, शेतकरी, गोवरी
-------
कोट
पात्र शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले. खरीप हंगामासाठी १ लाख चार हजार १६४ खात्यात ७५५ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपये, तर रब्बी हंगामासाठी २२ कोटी ६५ लाख दहा हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
- शंभुनाथ झा, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बॅंक, चंद्रपूर