: बालाजी महाराज मंदिरात घेतले दर्शन
फोटो
चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारूविक्री व वाढलेली गुन्हेगारी जिल्ह्यात कळीचा विषय ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी कधी हटणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. या विषयावर काही नागरिकांनी प्रश्न विचारले असता येत्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील दारूबंदी हटणार असल्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज कुलदैवत यांच्या दर्शनासाठी शुक्रवारी कन्या शिवानीसोबत ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. अचानक नववर्षाच्या पर्वावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरवरून थेट चिमूरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन राज्य व जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना सुखी ठेवण्याची मागणी करीत नववर्षाचा प्रारंभ केला. श्रीहरी बालाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने व आदेशानुसार नवीन वर्षातील कार्याला सुरुवात करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मार्चनंतर हटणार असून १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यातील दारू दुकाने पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत यावेळी काही नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिले.
श्रीहरी बालाजी देवस्थानचे विश्वस्त डाॅ. दीपक यावले, नीलम राचलवार यांनी श्री बालाजी महाराज यांची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री वडेट्टीवार यांचे स्वागत केले. दरम्यान, देवस्थानच्या नोंदवहीमध्ये अभिप्राय लिहिताना मंदिरातील व्यवस्था, स्वच्छता व सुरू असलेल्या कामांचे कौतुक करीत त्यांनी मंदिराच्या परिसरातील कामांची पाहणी केली. यावेळी काॅंग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन बुटके, भीमराव ठावरी, संजय डोंगरे, प्राचार्य सुधीर पोहनकर, राजेंद्र लोणारे, तुषार काळे, मनीष नंदेश्वर, राजू हिंगणकर, राजू डहारे, तुषार शिंदे, गिरीश भोपे, उमेश हिंगे, सुनील दाभेकर, प्रमोद दांडेकर, प्यारा बावणकर, अमय नाईक उपस्थित होते.