कोट्यवधीचे साहित्य भंगारात
: ४० वर्षांनंतरही प्रकल्पाच्या आशा धूसर
दिलीप मेश्राम
नवरगाव : मंजुरीनंतर हुमन प्रकल्पाच्या उभारणीसाठी विविध साहित्याची जुळवाजुळव करून १९८२ मध्ये कामाला सुरुवात झाली. परंतु, विविध अडचणींमध्ये प्रकल्पाचे बांधकाम रखडल्याने कोटींच्या वस्तू भंगारामध्ये हजारात विकल्या जात असल्याने कररूपात जमा जनतेच्या पैशाचा दुरूपयोग तर होत नाही ना, असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी असेच काही साहित्य पाच लाखांत विकण्यात आले.
सिरकाडा या गावाजवळील उमा नदीवर हुमन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. १९८२ मध्ये कामाला सुरुवात झाली. शिवाय, धरणाच्या पाळीजवळ, रत्नापूर शिवटेकडी परिसरात आणि गडमौशी येथे कर्मचाऱ्यांना निवासी व सामान ठेवण्यासाठी मोठ-मोठे गोडाऊन बांधण्यात आले. बरेच कर्मचारी राहायला लागले. यामुळे आपल्या परिसरात हुमन प्रकल्प होणारच आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिन्देवाही, मूल, सावली आणि पोंभुर्णा या चार तालुक्यांतील १६० गावांतील ४६ हजार ११७ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार ही बातमीच शेतकऱ्यांना आनंद देणारी होती. आजघडीला या प्रकल्पाच्या उद्घाटनापासून ४० वर्षांचा कालखंड होत आहे. आजही वर्षा दोन वर्षांतून या प्रकल्पाबाबत कोणते ना कोणते सर्व्हे, शासनाच्या बैठका होतात. परंतु, यातून मार्ग निघालेला दिसत नाही. त्यामुळे हुमन प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसते.
१९८२ मध्ये उद्घाटन झाले तेव्हा हुमन प्रकल्पाची अंदाजपत्रकीय किंमत ३३ कोटी ६८ लाख रुपये होती. सन २००८- ०९ मध्ये १०१६ कोटींवर पोहोचली. आतातर प्रकल्पाची किंमत त्याहून दुप्पट झाली आहे. दिवसेंदिवस किंमत वाढत जात आहे तर दुसरीकडे निर्माण केलेल्या वसाहतींमधील साहित्य भंगारात विकल्या जात आहे. सात आठ वर्षांपूर्वी प्रकल्पाच्या पाळीजवळील इमारतीचे साहित्य केवळ ३५ हजार रुपयांत विकण्यात आले आणि १६ फेब्रुवारी २०२१ ला झालेल्या लिलावात रत्नापूर शिवटेकडी परिसरातील वसाहतींमधील साहित्य यामध्ये काटेरी तारांचे बंडल १४६, इलेक्ट्रीक पोल ६४, ट्यूबलाईट फिटींग नग ५४, एंगल १२३५ नग जिएसटी सह केवळ ५ लाख २४ हजार १५६ रुपयांना विकण्यात आले आहे.
बॉक्स
बांधलेल्या इमारतीही पडल्या
बांधलेल्या इमारती काही पडल्या, काही जीर्ण झाल्या. हळूहळू असलेले साहित्य भंगारात विकल्या जात असून हुमन प्रकल्पाचे शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्नसुध्दा भंगारासारखे कुजत-कुजत नष्ट होते की काय, अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. शिवाय, जनतेकडून कररूपाने जमा पैशाचा दुरूपयोग होतो की कायॽ याचाही विचार करण्याची वेळ जागृत नागरिकांवर आलेली आहे.