छायाचित्र
मूल : शेताच्या पाळीवर अजगरासह अंडी असल्याची माहिती वासुदेव चौखुंडे या शेतकऱ्याने येथील संजीवन पर्यावरण संस्थेला दिली. संस्थेचे अध्यक्ष उमेषसिंह झिरे यांनी शेतात जाऊन अजगराला पकडून जंगलात निसर्गमुक्त केले आणि अंड्यांतून कृत्रिम पद्धतीने चार पिल्लांना जन्म दिला. अजगराच्या सर्व पिल्लांनाही बुधवारी निसर्गमुक्त केले. कृत्रिम पद्धतीने अजगराच्या पिल्लांना जन्म दिल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत अंतरगाव पारडवाही येथील वासुदेव गजानन चौखुंडे यांच्या शेतात एक अजगर आपल्या अंड्यांसोबत होता. ही माहिती क्षेत्र साहाय्यक प्रशांत खनके व वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांना देण्यात आली. वनकर्मचारी व संजीवन संस्थेच्या सदस्यांनी चौखुंडे यांना अजगराला अंड्यांतून पिल्ले निघेपर्यंत तिथेच राहू देण्याची विनंती केली; पण भीतीपोटी त्यांनी अजगराला शेतात राहू देण्यास असमर्थता दर्शवली. घटनेची माहिती चंद्रपूर वनविभागाच्या विभागीय वनाधिकारी सारिका जगताप, साहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाड व चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांना देण्यात आली. क्षेत्र साहाय्यक प्रशांत खनके, वनरक्षक सुभाष मरसकोल्हे यांच्या उपस्थितीत संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, तन्मयसिंह झिरे, मनोज रणदिवे, स्वप्निल आक्केवार, प्रशांत केदार, अंकुश वाणी, दिनेश खेवले यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडले व अजगराची अंडी ताब्यात घेतली. अजगराला वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे कक्ष क्रमांक ७५१ मध्ये निसर्गमुक्त करण्यात आले.
अजगर सापाच्या अंड्याला वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास दीड महिना त्या अंड्यांची योग्य काळजी घेतल्यानंतर पंधरा ते सोळा अंड्यांतून २० जुलै रोजी अजगराची चार पिल्ले बाहेर निघाली. या घटनेमुळे वनकर्मचारी आणी संजीवन संस्थेच्या सदस्यांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कृत्रिमरीत्या अजगराची अंढी उबवून पिल्ले निघण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. अजगराच्या चारही पिल्लांना वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ५२२ येथील नाल्याशेजारी सुरक्षितपणे सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक सुभाष मरसकोल्हे, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे, स्वप्निल आक्केवार, तन्मयसिंह झिरे, अंकुश वाणी, दिनेश खेवले, चेतन बोकडे, जय मोहुर्ले, रितेश पीजदूरकर, हर्षल वाकडे, अनुराग मोहुर्ले, रूपेश खोब्रागडे, अक्षय दुम्मावार उपस्थित होते.