सावित्रीबाई अंध विद्यालयाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील सावित्रीबाई फुले अंध विद्यालयातील काही विद्यार्थिनी एमएससीआयटीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका वर्षा सूंचुवार, तर प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल रखुमाई सेवा समितीचे अध्यक्ष अरुणा राजूरकर, संस्था अध्यक्ष कल्पना कोकास, शुभांगी तिडके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ दुर्गा या अंध विद्यार्थिनीच्या मधुर स्वरातील भजनाने झाला. अंध विद्यार्थिनी डोळस व्यक्तीएवढेच संवेदनशील असतात. त्यांना फक्त संधी मिळायला हवी, हे या विद्यालयातील विद्यार्थिनींनी एमएससीआयटीच्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन दाखविले, अशा शब्दात वर्षा सूंचुवार यांनी कौतुक केले. इतरांनीही विचार मांडले. संचालन व आभार संस्था सचिव सतीश शेंडे यांनी केले. याप्रसंगी ज्ञानेश्वर उद्रके, अनिता टाकसांडे, श्रद्धा बोंडे, कविता परचाके, लीना चिवंडे यांची उपस्थिती होती.