संदीप दिवाण : चंद्रपुरातील सेवेची वर्षपूर्तीचंद्रपूर : रस्त्यावरील अपघात असोत की, शहरातील वाहतुकीचे प्रश्न, या सर्व ठिकाणी प्रभावी सेवा देण्याची धडपत आपला विभाग करीत असला तरी, सर्व विभागांची साथ मात्र हवी, असा अपेक्षावजा सूर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी काढला. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीेस अधीक्षक म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमीत्त पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता, ते बोलत होते.चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर संदीप दिवाण जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपुरात वर्षभरापूर्वी बदलून आले होते. या वर्षभरातील कार्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्या असता ते म्हणाले, या वर्षभराच्या काळात गुन्ह्यांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न आपल्या विभागाने पुरेपूर केला. दारूबंदीमुळे ताण पडत असला तरी प्रभावी सेवा देण्याचा प्रयत्न आपल्या विभागाने सातत्याने केला. गुन्ह्यांचा उलगडा करून आरोपींना पकडण्यासाठी आपली धडपड असली तरी डॉ. जोगी हत्याकांडातील आरोपींना अद्यापही शोधता आले नाही, याची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली. असे असले तरी विभागाचे प्रयत्न तेवढ्याच जोमाने सुरु असल्याचे ते म्हणाले. चंद्रपूर शहरासह भद्रावती, वरोरा आदी शहरात चोऱ्या वाढल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, तीन विभाग पाडून त्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे दिली आहे. सोबतीला तीन पोलीस निरीक्षक आणि शिपाई असे पथक आहे. या पथकाची गस्त आणि नाकाबंदी सुरू आहे. तरीही मर्यादा आहेतच. काल रात्री भद्रावतीमध्ये नाकाबंदी सुरू असताना अगदी फर्लांगावर चोरीची घटना घडली, असेही उदाहरण आहे. प्रभावी सेवा देण्यासाठी पोलिसाची धडपड असली तरी अन्य विभागांनीही आपल्या जबाबदाऱ्या उचलायला हव्यात. महानगर पालिकेकडे शहर वाहतूक अभियंत्याचे पद असते. मात्र आपल्याकडे नाही. मनपाने आॅटोंचे थांबे निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे भर रस्त्यांवर वाहन उभे करून ग्राहक शोधणाऱ्यांवर कारवाई करताना अडचणी येतात. गतीरोधकांची उंची कमी करण्याच्या आणि त्यावर रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना बांधकाम विभागाला केव्हाच्याच मिळाल्या आहेत. मात्र अद्यापही पत्ता नाही, त्यामुळे अपघात घडतात. चंद्रपूर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याच्या मेंटनन्ससाठी महानगर पालिका निधी देणार होती. मात्र अद्यापही पैसा मिळालेला नाही. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यात पुढाकार घेऊन वायरलेट कॅमेरे लावण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसा प्रस्ताव आपण लवकरच पाठविणार आहेत. आगामी काळात जिल्ह्यात काही ठिकाणी नव्या पोलीस चौक्या आणि आऊट पोस्ट उभारण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविले जाणार आहेत. पोलिसांच्या वसाहतीचे कामही सुरू होणार आहे. चंद्रपुरात ३६४ क्वार्टरसाठी १०५ कोटी रूपये मंजूर आहेत. ते काम यंदा सुरू होणार आहे. २०१६-१७ या वर्षात ४०० सदनिका बांधल्या जाणार आहेत. भद्रावती, वरोरा, राजुरा, गडचांदूर येथेही पोलिसांसाठी घरे उभारण्याचा प्रस्ताव आहे. कार्यक्षम पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना वाव देण्याचा आपला प्रयत्न असतो. ठाणेदारांच्या रजा तात्काळ मंजूर करून कनिष्ठ अधिकाऱ्याला संधी देतो. त्यामुळे अधिकाऱ्यांमधील कार्यक्षमता वाढते, कार्यक्षम अधिकारी पुढे येतात. बिटात काम करणाऱ्या पोलिसांसाठी नवी कार्यपद्धती आपण आखत आहेत. त्यातून कामाचा वेग वाढेल. महाविद्यालये सुरू झाल्यावर जुलैपासून दामिनी पथक नव्या दमाने कार्यरत झालेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)वाहतूक पोलिसांप्रति एसपी संवेदनशीलचौकात उभे राहून ऊन्हवाऱ्यात सेवा देणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी काहीतरी करण्याची तळमळ पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी बोलून दाखविली. त्यांना पाण्याच्या बॉटल्स, छत्री, मास्क, पुरविण्याबद्दल ते विचार करीत आहेत. चौकात शक्य असेल, त्या ठिकाणी शेड उभारण्याच्या दृष्टीनेही त्यांची चाचपणी सुरु आहे.
प्रभावी सेवेसाठी सर्व विभागाची हवी साथ
By admin | Updated: May 18, 2016 00:47 IST