चिमूर तालुक्याचाही नावलौकिक : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे नवे प्रवेशद्वारराजकुमार चुनारकर चिमूर‘जंगलाच्या राजा’च्या हमखास दर्शनाने जगविख्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारात आणखी भर टाकत चिमूर तालुक्यातील अलीझंजा या आदिवासीबहुल गावात व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. वाघामुळे जगात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सोबतच आता आदिवासीचा ‘अलीझंजा’ जगाच्या पटलावर चमकणार आहे.टायगर कॅपीटल नागपूरपासून १२५ कि.मी. अंतरावर ताडोबाच्या जंगलात वसलेल्या अलीझंजा गावाची लोकसंख्या आदिवासी असून गावातील काही नागरिकांकडे थोडी फार शेती आहे तर उर्वरित नागरिक जंगलावर आधारित रोजगार किंवा मजुरी करूनच आपली उपजिविका भागवितात. अनेक वर्षांपासून या गावाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या गावात आजपर्यंत बस तथा इतर वाहनांचा प्रवेश नव्हता झाला. गावात इयत्ता चारपर्यंतच शिक्षणाची व्यवस्था आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चिमूरला यावे लागते. आरोग्याच्या सुविधाही नसल्याने अनेक रुग्णांना खाटेवरच जीव गमवावा लागल्याच्या घटना या गावकऱ्यांनी बघितल्या आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी मोहर्ली गेट, खुटवंडा गेट, नवेगाव गेट, कोलारा गेट या प्रवेशद्वारामधून प्रवेश दिला जातो. या प्रवेशद्वाराजवळ पर्यटकासाठी मोठमोठे रिसोर्ट तयार करण्यात आले. त्यातून काही प्रमाणात या गावात वर्दळ सुरू होवून रोजगार उपलब्ध झाला आहे. व्याघ्र प्रकल्पात रोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता प्रकल्प व्यवस्थापनाने पर्यटकांच्या सोईसाठी नव्याने अलीझंजा या आदिवासीबहुल गावात बफर झोन गेटचा शुभारंभ नुकताच आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते केला आहे. या प्रवेशद्वारातून रोज सहा गाड्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे रोज विदेशी पर्यटकासह देशातील मोठमोठ्या सेलीब्रेटीचे दर्शन या गावातील आदिवासींना होणार आहे. प्रवेशद्वाराच्या निर्मितीमुळे या आदिवासी गावाचा विकास होऊन बेरोजगारांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘अलीझंजा’ जगाच्या पटलावर
By admin | Updated: May 19, 2016 00:42 IST