चंद्रपूर : अंगणवाडी महिलांनी दीर्घकाळ लढा देऊन मानधन वाढ मिळवून घेतली व त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१४ पासून करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. अंमलबजावणी होऊन वाढीव दराने मानधन सुरू झाले. मात्र असे असताना सत्तेत नव्याने आलेल्या भाजप शासनाने तत्कालीन सरकारचा निर्णय बदलवून १ एप्रिल २०१५ पासून मानधन वाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे केले. अल्पशा मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचे ११ हजार ४०० रुपये तर मदतनिसांचे सहा हजार रुपये भाजप शासनाने गिळंकृत केले आहे. त्यामुळे अंगणवाडी महिलांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. या निर्णयाच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा परिषदेसमोर धरणे देण्यात आले. मानधन वाढीचा निर्णय मागे घ्या, तत्कालीन सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी मार्गदर्शन करताना शासनकर्त्यांनी अंगणवाडी महिलांच्या पोटात खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला. शासनाने हा निर्णय त्वरीत मागे घेऊन अंगणवाडी सेविकांची उपासमार थांबविण्याची मागणी केली. धरणे आंदोलनात शोभा मांडवकर, ज्योती लोडल्लीवार, आशा नाखले, संध्या खनके, रेखा रामटेके, कुंदा वाघमारे, वैशाली बोकारे, कविता बोकारे, शकुंतला शर्मा, सुशीला कर्णेवार आदी अंगणवाडी महिला सहभागी झाल्या होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)
शासन निर्णय विरोधात अंगणवाडी सेविकांची धरणे
By admin | Updated: March 25, 2015 01:26 IST