गोंडपिपरी : निवडणूक विभागामार्फत पार पडलेल्या तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणानंतर अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले असून बहुतांश जागेवर महिला आरक्षण निघाल्याने तालुक्यातील दिग्गज नेत्यांना याचा फटका बसला तर कुठे अपेक्षित आरक्षणात फेरबदल झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला असून तालुक्यात कही खुशी कही गम असे चित्र निर्माण झाले आहे.
शुक्रवारी स्थानिक पंचायत समिती सभागृहात तहसीलदार के. डी. मेश्राम तसेच संवर्ग विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी तालुक्यातील बहुसंख्येने नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य तथा राजकीय मंडळी उपस्थित होती. आरक्षणाची सोडत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, तथा सर्वसाधारण असे क्रमवार आरक्षणाची सोडत सुरू असताना गेल्या १५ ते २० वर्षांपूर्वीच्या आरक्षणाच्या आधारे नुसार तसेच प्रवर्गनिहाय आरक्षण लाभलेल्या ग्रामपंचायतीला २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षण नियमानुसार सोडत प्रक्रिया सुरू झाली. यात ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने प्रत्येक प्रवर्गामध्ये महिला आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर अनेकांना महिला आरक्षणामुळे सरपंच पदापासून मुकावे लागले. तर महिला गटात आनंदाची लाट ओसरली. यावेळी आरक्षणाबाबत शंका-कुशंका असलेल्यांनी प्रश्न उपस्थित केले असता त्याची वेळीच निरासन करून तहसीलदार मेश्राम यांनी समाधान केले. तालुक्यात एकूण ५० ग्रामपंचायती असून, त्यापैकी ४३ ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच त्याचा निकाल जाहीर झाला. उर्वरित सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात होणार असून त्याचे सरपंच पदासाठीचे आरक्षण पूर्वीच जाहीर झाल्याने येणारी निवडणूक लढविणाऱ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. तालुक्यात महिला आरक्षणाचा फटका अनेक दिग्गजांना बसला असून, तालुक्यातील गटातटाच्या राजकारणात ‘कही खुशी कही गम’ असे चित्र निर्माण झाले आहे.