चंद्रपूर : येथील सार्वजनिक बांधकाम मंडळातील २४ शाखा अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश निघून आठवडा लोटला आहे. मात्र आठवडाभरानंतरही आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने येथील अभियंत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कागदोपत्री आदेश निघाले असले तरी, या मंडळाचे अधीक्षक अभियंता जनबंधु यांच्या मौखिक आदेशामुळे पुढची प्रक्रिया त्यांच्या दालनातच रखडल्याची माहिती आहे.सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर अंतर्गत शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता-श्रेणी दोन या पदावरील अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश ३१ मे रोजी निघाले. यात २४ अभियंत्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. त्यातील सहा अभियंत्यांच्या बदल्या नक्षलग्रस्त क्षेत्रातील सेवेचा निकष लावून गडचिरोली जिल्ह्यात झाल्या आहेत. तर, उर्वारित १८ अभियंत्यांच्या बदल्या मंडळाअंतर्गत झाल्या आहेत. बदलीचे आदेश निघून आठवडा लोटला. संबंधितांचे आदेश कार्यकारी अभियंत्यांकडेही पोहोचले. मात्र त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ही प्रक्रिया जेवढी लांबविता येईल तेवढी लांबविण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरूनच सुरू असल्याने कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातून यावर निर्णय घेण्यात विलंब होत असल्याची माहिती आहे. अनेकांच्या बदल्या इच्छेविरूद्ध झाल्याने त्या थांबविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तर काही अभियंते आपल्या इच्छेप्रमाणे ठिकाण मिळविण्यासाठी धडपडत आहे. या मानसिकतेच्या पार्श्वभूमिवर अधीक्षक अभियंता जनबंधु यांनी मौखिक आदेश देवून पुढची प्रक्रिया थांबविल्याची माहिती आहे. या काळात बदल्यांच्या नाावाखाली घोडेबाजार सुरू झाल्याचीही चर्चा असून संबंधित अभियंत्यांना साहेबांच्या कार्यालयातील मर्जीतील लिपिकांकडून आणि हस्तकांकडून भेटीला येण्याचे निरोपही धाडले जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात विदर्भातील बदल्यांची प्रक्रिया गाजत असतानाच यात चंद्रपुरातील सार्वजनिक बांधकाम मंडळातील अनुभवाचीही भर पडली आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम मंडळात अभियंत्यांच्या बदल्याचीच चर्चा सुरू आहे. एकीकडे अभियंत्यांना बदल्याची प्रतीक्षा असताना दुसरीकडे वरिष्ठांच्या मौखिक आदेशाने बदल्यांची प्रक्रीया का थांबविली, असा प्रश्न आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अभियंत्यांच्या बदल्यांना अधीक्षक अभियंत्यांच्या मौखिक आदेशाचा अडसर
By admin | Updated: June 10, 2014 23:57 IST