गेवरा : ब्रह्मपुरी व चंद्रपूर वनविभागाच्या मध्यभागात असलेल्या व भौगोलिकदृष्ट्या सावली तालुक्यात येणाऱ्या सावली वन परिक्षेत्र व ब्रह्मपुरी, सिंदेवाही वनपरिक्षेत्राच्या वनपरिसरात भ्रमण करणाऱ्या वन्यप्राण्यांचा सुरक्षित आश्रयस्थान असलेल्या आसोलामेंढा तलाव परिसरात शिकारी टोळी सक्रीय झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. या जलाशयाशेजारी असलेल्या अनेक मानवी वसाहती या जंगल व्याप्त असल्याने वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असणे नित्याचीच बाब झाली आहे. सद्यस्थितीत या जलाशयात अत्यंत कमी प्रमाणात पाणी साठून असल्याने जलाशयाचा बराच भाग रिकामा झालेला आहे. जलाशयाच्या पार्श्वभागापुढील असलेल्या वनातून वन्यजीव पाणी पिण्यासाठी येतात. याचाच फायदा या भागात सक्रीय असलेल्या शिकारी टोळ्या घेत असतात. ३० जूनला गुंजेवाही येथील पोलीस पाटील वंदना चन्ने यांचे पती हे खाजगी कामानिमित्य याच जलाशयामार्गे पाथरी येथे जात असताना जलाशयाच्या काठाजवळ शिकारी आढळून आले. याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला देण्यात आली. घटनास्थळाची संपुर्ण पाहणी करून गंभीर प्रकाराची माहिती वनपरिक्षेत्र सावली व सिंदेवाही यांना दिली. लागलीच वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळावर येऊन चौकशी केली असता त्या परिसरात जाळे लावल्याचे दिसले. सदर शिकारी जाळे हे २५ मीटर लांब व ७ मीटर रूंदीचे असल्याचे निदर्शनास आले. सदर जाळ्याचे निरीक्षण केले असता त्याला रक्ताचे डाग लागले होते. त्यामुळे वनअधिकाऱ्यांनी प्राथमिक अंदाजावरून मागील आठवड्यात वन्यप्राण्याची याच जाळ्याचे सहाय्याने शिकारी टोळीने शिकार केल्याचा निष्कर्ष काढला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून अज्ञात आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम १९७२ ची कलम ९ अन्वये वनगुन्हे दाखल करण्यात आले.अज्ञात शिकारी टोळीचा शोध घेण्यासाठी वनविभागाची एक विशेष चमु कामाला लागल्याने आता शिकारी टोळके वनविभागाच्या रडारवर आहे. असे असले तरी ही शिकारी त्याच परिसरात सक्रीय असल्याची माहिती आहे. या परिसरात वनविभागासोबतच एफडीसीएमचेही जंगल आहे.त्यामुळे क्षेत्र कुणाचे, या प्रश्नावरून कारवाई करण्यास ढिलाई केली जाते. परिणामी वनाच्या संवर्धनाची व वन्यजिवांच्या रक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान वन्यजिवांचे रक्षण करावे, अशी अपेक्षा करणे वन्यजीवप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. सदर जलाशय हे पाटबंधारे विभाग गोसेखुर्द प्राधिकरणकडे हस्तांतरित केल्याने याची जबाबदारी मात्र सावली येथे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांकडे आहे.या प्राधीकरणचा स्वतंत्र पुर्ण वेळचा अधिकारी नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या जलाशयाचा विस्तार करण्यासाठी अनेक वर्षापासून शासन स्तरावरील निर्णय कागदोपत्रीच रखडला आहे. येथील विश्रामगृह परिसराचाही गैरकृत्यांसाठी वापर होताना दिसत आहे. याच स्थळापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे, वनविभागाचे क्षेत्र सहायक मुख्यालय तसेच वनविकास महामंडळाचे परिक्षेत्र मुख्यालयसुद्धा आहे. एवढी मोठी जबाबदार प्रशासकीय यंत्रणा असताना अशा असामाजिक कृत्यांवर नियंत्रण नसणे ही बाब चिंतनीय आहे.या सर्व बाबींचा विचार केल्यास या परिसरातील वनसंपदा, वन्यजीव व जैवविवीधता नष्ट होण्यास ही गैरकृत्य व असामाजिक तत्वेच कारणीभूत ठरणार आहे. यासाठी सर्व संबंधीत विभागाने गंभीर होणे अत्यावश्यक आहे. (वार्ताहर)
आसोलामेंढा जलाशय परिसरात शिकारी टोळी सक्रिय
By admin | Updated: June 4, 2015 01:15 IST