राजुरा : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत सास्ती एक्सपान्शन परियोजनेकरिता मौजा माथरा येथील जमिनी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, यातील काही जमिनी अधिग्रहणाच्या सेक्शन ४ मधून वगळलेल्या आहेत. त्या शेतजमिनी वेकोलीने अधिग्रहित करण्याची मागणी करीत माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत सास्ती एक्सपान्शन परियोजनेकरीता मौजा माथरा येथील शेतजमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. परंतु सेक्शन ४ लावण्यात आलेल्या शेतजमिनीमधून सर्व्हे क्र. ५, ७, ८, ११, १४, २५, २६, २७, ५३, ५४, व ६० ही शेतजमीन वगळण्यात आलेली आहे. मात्र, या जमिनी नाल्याला लागूनच असल्यामुळे येथील शेतकरी भविष्यात शेती करू शकणार नाही. वेकोलीच्या ओव्हरबर्डनमुळे आधीच या भागातील नाल्यांना कृत्रिम पुराचा फटका बसत असून शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान होत आहे.
त्यामुळे सेक्शन ४ मधून वगळलेल्या जमिनी अधिग्रहित करण्याची मागणी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे केली आहे.