जयंत जेनेकर
कोरपना : औद्योगिकदृष्ट्या विकसित म्हणून कोरपना तालुका ओळखला जातो. परंतु कोरपना भागात उद्योगच नसल्याने बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे नव्या उद्योग निर्मितीला चालना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
जल, जंगल, खनिज संपत्तीचा मुबलक ठेवा तालुक्यात आहे. मात्र तालुक्यातील सर्व उद्योग गडचांदूर, नांदा, नारंडा, उपरवाही या एकाच पट्ट्यातील भागात आहे. उर्वरित कोरपना, कोडशी, पारडी, येरगव्हाण या भागात शेतीशिवाय दुसरा मोठा उद्योग नाही. परिणामी येथील सुशिक्षित बेरोजगारांना इतरत्र ठिकाणी कामाला जाण्याशिवाय पर्याय नाही. या कारणाने उमेदीची तरुण मंडळी बाहेर आणि वयोवृद्ध शेतात अशी परिस्थिती आहे. यादृष्टीने कोरपना क्षेत्रात एमआयडीसी, सूतगिरणी, सिमेंट उद्योग आदी उद्योग स्थापवून परिसराचा औद्योगिक विकास साधावा. यासाठी जेवरा, मांडवा, चोपण, जांभूळधरा गावालगत मोठ्या प्रमाणात शासकीय जमिनी उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योग निर्मितीस कुठलीच अडचण नाही. यावर शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालावे. उद्योग पायाभरणीला वाव द्यावा,
अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बॉक्स
उद्योगामुळे मिळेल बाजारपेठेला बळकटी
कोरपना हे तालुक्याचे स्थान आहे. चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग व वणी राज्य महामार्गावर स्थित आहे. त्यामुळे वस्तू विनिमय दृष्टीने मोठ्या बाजारपेठा येथून जवळ आहे. या भागात औद्योगिकीकरण झाल्यास बाजारपेठेचाही विकास आपसूक घडून येईल. त्या दृष्टीने उद्योगांची निर्मिती होणे गरजेची आहे.