तालुक्यातील आठही केंद्र बंद : नागरिक आधाराच्या प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : शासकीय कामकाजासाठी व योजनांसाठी सक्तीचे करण्यात आलेले आधार कार्ड कोरपना तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मिळत नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नोंदणी होऊनही आधार कार्ड बनले नसून नवीन नोंदणी किंवा सुधारणा करणेही बंद आहे. तालुक्यात आठ आधार केंद्र असूनसुद्धा दैनंदिन व्यवहाराकरिता पर्वणी ठरणारे आधार कार्ड आता मात्र निराधार झाल्याचे दिसून येत आहेत. आधार कार्डबाबत जिल्हा प्रसाशनाने प्रारंभी सकारात्मक पावले उचलली होती. मात्र आता ते अशा प्रकारापासून अनभिज्ञ आहे. तालुक्यात तीन शहरे व ११० गावे यांची अंदाजे लोकसंख्या एक लाख २१ हजार ४७९ आहे. यातील कित्येक लोकांकडे अजूनही आधार कार्ड नाहीत. गेल्या एक महिन्यापासून आधार कार्ड का बनत नाही, याचे उत्तर जिल्हा प्रशासन आणि यू.आय.डी विभागाकडे नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सर्व स्तरावर जनतेला जगण्याचा परवाना ठरलेल्या आधार कार्ड तयार करणारी यंत्रणा मागील एक महिन्यांपासून कोमात गेल्याने तालुक्यातील हजारो नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आधार कार्ड नाही, शिवाय आॅनलाईन यंत्रणाही कुचकामी ठरत असल्याने विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना आता व्यवहार कसा करावा, या चिंतेने ग्रासले आहेत.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली तक्रार यंत्रणा सज्ज केली आहे. हॅलो चांदा नावाची हेल्प लाईन सुरु केली आहे. या यंत्रणेमुळे तरी नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.विद्यार्थ्यांची गैरसोयशाळेत नवीन अडमिशन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड असणे सक्तीचे केले आहे. तसेच गणवेशाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे असल्याने तिथेही आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने बँक खाते उघडण्यात अडचणी निर्माण होत आहे.याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांनासुद्धा सहन करावा लागत आहे. तालुक्यात आठ आधार कार्ड केंद्र आहेत. बऱ्याचशा खेडेगावातील नागरिकांनी आजही आधार कार्ड काढलेले नाही. विविध शासकीय योजनांकरिता आधार कार्ड सक्तीचे असल्याने अनेक लाभार्थी लोकांना आज आधार कार्डची आवश्यकता आहे. मात्र आधार सेवा बंद असल्याने त्यांना आधार केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. सरकारने आधार आणि पॅन लिंकवर सध्या भर दिला आहे. परंतु कित्येक नागरिकांच्या पॅन कार्डवर नावाच्या आणि जन्म तारखेच्या चुका आहेत. त्या सुरळीत करण्याकरिता आधार कार्ड आवश्यक आहेत. आधार कार्ड केंद्र बंद असल्यामुळे आधार व पॅन लिंकिंगचे कामसुध्दा ठप्प पडले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेशासनाने जवळपास सर्वच व्यवहाराकरिता आधार कार्ड सक्तीचे केले आहे. तालुक्यातील आठ केंद्रामार्फत आधार कार्ड बनविण्याचे काम थांबले असून नागरिकांची इकडून तिकडे भटकंती सुरू आहे. जातीचे दाखले, बँकेचे केव्हायसी फार्म, राशन कार्ड, गॅस कनेक्शन याशिवाय इतर विविध शासकीय योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक झाले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांंनी स्वत: याकडे लक्ष देऊन नागरिकांना आधार द्यावा, अशी मागणी आहे.
आधार यंत्रणा झाली निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:33 IST