६ हजार ७६६ व्यावसायिकांना लाभ : अनेकांनी उभारला हक्काचा व्यवसायचंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपला स्वंयरोजगार सुरु करण्यासोबतच छोट्या मोठ्या व्यवसायीकांना आपल्या व्यवसायात वाढ करता, यावी म्हणून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यातच तब्बल ६ हजार ७६६ व्यक्तींना कर्ज देण्यात आले असून ही रक्कम ८१ कोटी ५४ लाखांच्या घरात आहे. अनेक होतकरु युवक स्वत:चा रोजगार निर्माण करु इच्छितात. परंतु त्यासाठी आवश्यक भांडवलाची तरतूद होत नसल्याने युवकांचे व्यवसायीक होण्याचे स्वप्न पूर्ण होवू शकत नाही. अशा होतकरु युवकांना सहज कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना सुरु करण्यात आली आहे.सदर योजना तीन स्थरावर राबविली जाते. त्यात शिशुगट योजने अंतर्गत १० ते ५० हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. किशोरगटात ५० हजार ते ५ लाखांपर्यंत तर तरुण गटात ५ लाख ते १० लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची तरतूद आहे. नवीन होतकरु युवकांसोबतच अस्तिवात असलेल्या व्यवसायाच्या वाढीसाठीही योजनेअंतर्गत कर्ज दिल्या जाते.सहकारी, राष्ट्रीयकृत, प्रादेशिक ग्रामीण बँक व बिगर बँक वित्तीय संस्थामार्फत कर्ज दिले जाते. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या आवडी किंवा कौशल्याप्रमाणे योजनेअंतर्गत व्यवसाय निवडण्याची मुभा आहे. साधारणपणे ग्रामीण भागात छोटे-मोठे व्यवसाय, दुकान, जोड व्यवसाय तसेच लहान मोठे उद्योग, प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कर्ज देण्याची तरतूद या योजनेत असून याचा अनेकजण लाभ घेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
‘मुद्रा’ने दिले ८१.५४ कोटींचे कर्ज
By admin | Updated: September 30, 2016 00:59 IST