नवरगाव : सिंदेवाही तालुक्यात कुठलाही मोठा उद्योग नसल्याने नागरिक संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. येथील शेती ही घोडाझरी या एकमेव तलावावर अवलंबून असून तलावामध्ये केवळ आठ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झालेला आहे.नवरगाव परिसराचा विचार केल्यास ९५ टक्के शेती ही घोडाझरी या एकमेव तलावावर अवलंबून असून आॅगस्ट महिना अर्धा होत आला तरी केवळ आठ टक्के जलसाठा तलावात आहे. या तलावावर ६ हजार ८०० हेक्टर शेतजमिनीचे सिंचन अवलंबून आहे. या परिसरात धानाचे मुख्य पीक असून आर्थिक व्यवस्था शेतीवरच निर्भर आहे. दरवर्षी १५ आॅगस्टच्या आसपास घोडाझरी कालव्याचे पाणी या परिसरात येत होते. परंतु आठ टक्केच पाणी असल्याने आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घोडाझरी तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकऱ्यांनी रोवणीच केलेली नाही, हे विशेष.निसर्गानेही यावर्षी दगा दिला असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. पाऊस नसल्याने धान पऱ्ह्याची काही शेतकऱ्यांनी दुबार- तिबार पेरणी केली. यासाठी विविध संस्था, खासगी सावकाराकडून कर्जही घेतले. परंतु निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी पूर्णत: खचलेला आहे.गोसीखुर्द धरणाचे पाणी या परिसरात आणणार, असा गाजावाजा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केला. परंतु आज शेतकऱ्यांवर गोसीखुर्दच्या पाण्याची नितांत गरज असतानासुद्धा ते मिळू शकलेले नाही. परंतु गोसीखुर्दचे पाणी मिंडाळा ब्रॅचमधून उपसा सिंचन योजनेद्वारे घोडाझरी तलावात आणणे व शेतकऱ्यांना पुरवठा करणे शक्य आहे. त्यासाठी शासनाने, राजकीय पुढाऱ्यांनी, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ही योजना शक्य झाल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना पहिले धानाच्या रोवणीसाठी व पीक घेण्यास लाभदायक ठरणार आहे. नाही तर शेतकरी हा आर्थिकदृष्टया पुन्हा कमकुवतच होणार आहे.घोडाझरी सिंचाई शाखेच्या अंतर्गत पुन्हा पाच मालगुजारी तलाव आहेत. परंतु त्यांचीही परिस्थिती तशीच आहे. केवळ गिरगाव येथील मालगुजारी तलावात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून इतर चार तलावात निघणारे पाणी शुन्य आहे. या परिसरातील तलाव, खासगी बोड्या यासुद्धा कोरड्याच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच गंभीर आहे.घोडाझरी सिंचाई शाखा नवरगाव येथील शाखा अभियंत्याचे पद मागील चार- पाच महिन्यापासून खाली असून येथील अतिरिक्त पदभार गोविंदपूर येथील शाखा अभियंता ए.एस. यादव यांच्याकडे आहे. दरवर्षी पावसापूर्वी कालव्याच्या दुरुस्तीची कामे केली जात होती. मात्र यावर्षी कामेच झाली नाहीत. समजा घोडाझरी तलावाला पाणी आले आणि सोडण्याचा प्रसंग आला तरी कालव्याच्या दुरुस्तीअभावी पाण्याचे वितरण करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. इंग्रजांच्या काळापासून नवरगाव शाखेची इमारत असून ही इमारत कालबाह्य झालेली आहे. पावसात कार्यालय गळते. त्यामुळे अधिकारी येथे राहात नाहीत. विशेष म्हणजे, लगतच जागा असून त्यावर क्वार्टर बांधले तर अधिकारी येथेच राहतील आणि शेतकऱ्यांच्या सोईचे होईल.एकूण शेतकरी हा निसर्गाकडून नागविला गेला असून आता रोवणी करणेही शक्य राहिले नाही. त्यामुळे तो मोठ्या विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आशा उंचावण्यासाठी गोसीखुर्दचे पाणी घोडाझरीत टाकून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
घोडाझरी तलावात आठ टक्केच पाणी
By admin | Updated: August 14, 2015 01:20 IST