बल्लारपूर : वय कमी, कमावती मुले, सधन परिस्थिती व विविध कारणाने तहसील कार्यालयात झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत सादर केलेल्या २५६ लाभार्थ्यांच्या प्रकरणातून १८१ लाभार्थी पात्र ठरविण्यात आले, तर ७५ लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले.
सध्या बोगस कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेतल्या जात आहे. यामुळे आता बोगस लाभार्थ्यांची खैर नाही. बल्लारपूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे दोन हजार ४८९ लाभार्थी आहेत, तर श्रावणबाळ योजनेचे २ हजार ७८८ लाभार्थी आहेत. तहसील कार्यालयाकडून प्रत्येक लाभार्थ्यांना महिन्याला एक हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात.
पात्र ठरलेले लाभार्थी
मंजूर लाभार्थ्यांमध्ये विसापूर, दहेली, मानोरा, इटोली, बामणी, किन्ही, पळसगाव, हडस्ती, कवडजई, कळमना, कोठारी व बल्लारपूर येथील श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनांमधील ८२ जणांची यादी मंजूर करण्यात आली आहे, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ९९ लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये अपंग २२ व ६ अविवाहित महिला, कॅन्सर रुग्ण १, घटस्फोट १, टीबी १, दुर्धर आजार ४, परितक्ता ७, विधवा ५३ व सिकलसेलच्या ४ लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले, तर बैठकीत श्रावणबाळ योजनेचे ५२ व संजय गांधी निराधार योजनाचे २३ लाभार्थ्यांची कागदपत्रे विविध कारणाने नामंजूर करण्यात आल्याचे लिपिक सुनील दडमल यांनी सांगितले.
कोट
ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांकडून नव्याने ८० अर्ज आले असून, तलाठ्यांच्या माध्यमातून त्यांची पडताळणी करणे सुरू आहे. ते मंजुरीसाठी मार्चच्या बैठकीत ठेवण्यात येतील.
- संजय राईंचवार, तहसीलदार, बल्लारपूर