लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या जिल्ह्यातील प्राधान्य वयोगट लक्षात घेऊन त्यानुसार लस पुरवठ्याचे सूत्र ठरविणे अत्यावश्यक आहे. मात्र, असे कोणतेही सूत्र न ठरविता वरिष्ठ स्तरावरून अत्यल्प लस पुरवठा केला जात आहे. पहिला व दुसरा डोस घेणारे शेकडो नागरिक आल्या पावली परत जात आहेत. गुरुवारी सात-साठ केंद्रांचा अपवाद वगळल्यास लस उपलब्ध नाही. परिणामी, जिल्ह्यातील सुमारे ४०० केंद्रे आरोग्य प्रशासनाला नाईलाजास्तव बंद ठेवावी लागणार आहेत.कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ४१३ केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही ४० पेक्षा जास्त केंद्रे सुरू आहेत. मात्र, पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना कालावधी पूर्ण होऊनही लस मिळत नसल्याने शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. पुरेसे डोस मिळाले असले तर लस घेणाऱ्यांची संख्या वाढली असती.
पाच लाख ५४ हजार ३३ जणांनी घेतली लसआरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजता लसीकरणाला सुरुवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कुपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढे डोस आले तेवढीच कुपन आधी वितरण केली जातात. नागरिक पहिल्यांदा कुपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही. पण, कुपन वाटणे सुरूच असते. त्यामुळे केंद्रात १०० लस उपलब्ध असताना २०० ते २५० नागरिक केवळ कुपनसाठी रांग लागतात. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख ५४ हजार ३३ जणांनी लस घेतली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मन:स्ताप६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन किंवा चार केंद्रे सुरू असतात. त्यातही आता १८ ते ४४ गटासाठीच तीन केंद्रे सुरू आहेत. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना निराश होऊन घरी परत जावे लागते. १८ वर्षांवरील तरूणही तात्कळत आहेत.