चंद्रपूर : : जिल्ह्यात मागील २४ तासात २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ३१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ६८३ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ९५९ झाली आहे. सध्या ३४७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८५ हजार ५१६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ६० हजार ५९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३७७ बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३४४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधित आलेल्या ३१ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील १६, चंद्रपूर तालुक्यात एक, बल्लारपूर एक, भद्रावती सात, ब्रम्हपुरी एक, मूल एक, चिमूर एक, कोरपना एक व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.