बल्लारपुरातील घटना : पोलिसांची संयुक्त कारवाईबल्लारपूर : पाच वर्षीय बालकाचे अपहरण करुन त्याची विक्री करण्यासाठी दिल्लीला नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आमला रेल्वे स्टेशनवर अटक केली. रवी केशकर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी दक्षिण एक्सप्रेसने मुलाला दिल्लीला नेत होता. बल्लारपूर येथील सरदार पटेल वार्डातील रहिवासी शिवशंकर निषाद यांचा पाच वर्षीय मुलगा क्रिष्णा अंगणात खेळत होता. मात्र वेळ होऊनसुद्धा तो घरी परत न आल्यामुळे आईवडीलांनी घराशेजारी चौकशी केली. मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर रात्री २.३० वाजता अपहरणाची तक्रार बल्लारपूर पोलीस स्टेशनला करण्यात आली. बल्लारपूचे ठाणेदार सिरस्कर यांनी याची माहिती त्वरीत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांना दिली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन रेल्वे स्टेशन, बसस्थानक, लॉज, हॉटेल, व शहरातील प्रमुख मार्गावर चौकशी सुरु केली. त्यावेळी आरोपी रवी केशकर याने मुलाचे अपहरण केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरपीएफचे पोलीस निरीक्षक दीपक सोनटक्के, सायबर सेलचे उपनिरिक्षक मुडे व हवालदार अली यांना माहिती दिली. त्यावेळी आरोपी दक्षिण एक्सप्रेसने दिल्ली जाण्यासाठी निघाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपीला आमला स्टेशनवरुन अटक करण्यात आली. मुलाला आईवडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
२४ तासांत अपहरणकर्त्या आरोपीला अटक
By admin | Updated: September 6, 2016 00:35 IST