कोरपना : जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे महावितरणचे महाकृषी अभियान शुक्रवारी पार पडले. कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत एकूण १७ लाखांची थकबाकी शेतकरी मेळाव्यादरम्यान वसूल झाल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रतिकृती रथाचे उद्घाटन करण्यात आले असून वाहनावर कृषिपंपाची नावीन्यपूर्ण प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत बिबी परिसरात आयोजित या कृषी मेळाव्याला महावितरणचे विभागीय व्यवस्थापक सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, बिबी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशिष देरकर, हरीश गजभिये, अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे उपस्थित होते. उत्कृष्ट अभियंता म्हणून महेश वाटेकर व प्रमोद राऊत यांचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच थकबाकी भरलेल्या शेतकऱ्यांचा थकबाकीमुक्त शेतकरी म्हणून महावितरणच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
शेतकऱ्यांना शेतीपंपाचे ५० टक्के बिल भरण्याची संधी असून शेतकऱ्यांनी महाकृषी योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडे असलेली थकबाकी भरावी, असे आवाहन महावितरणचे नागपूर विभागीय व्यवस्थापक सुहास रंगारी यांनी केले आहे.
सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता महेश तेलंग यांनी केले. यावेळी गडचांदूर उपविभागाचे अभियंता अतुल इंदूरकर, सहाय्यक अभियंता महेश वाटेकर, सहाय्यक अभियंता प्रमोद राऊत, कनिष्ठ अभियंता संतोष शिंदे, प्रधान तंत्रज्ञ चंद्रभान नागरकर, वरिष्ठ तंत्रज्ञ किशोर घुगुल, तंत्रज्ञ गणेश मेश्राम, डंभारे, कुमरे, लेखापाल महेश रायपुरे, ग्रामपंचायत बिबीचे कर्मचारी सुनील कुरसंगे, अनिल आत्राम, मारोती घोडाम, अनिल मारटकर, आनंद कनकुटला, मंगल सलाम आदी उपस्थित होते.