फोटो
ब्रह्मपुरी: शहराला लागूनच असलेल्या तसेच ब्रह्मपुरी नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या बोंडेगाव शिवारातील जवळपास १५ ते २० तणसांच्या ढिगांना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे गावातील काही तरुणांना दिसताच त्यांनी लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु लागलेली आग विझवू शकले नाही. यात सुमारे ५० ट्रॅक्टर तणसीचे ढीग जळून खाक झाले.
लागलेल्या आगीत बोंडेगाव येथील शेतकरी दयाराम बगमारे, विलास करंबे, देवीदास कुत्तरमारे, विलास बगमारे, दिनेश करंबे यांचे तणसीचे ढीग ठेवलेले होते. अचानक आग लागताच जवळजवळ ठेवलेले सर्व ढीग जळून खाक झाले. आग मात्र नेमकी कशामुळे लागली, हे मात्र कळू शकले नाही. सदर घटनेची माहिती ब्रह्मपुरी अग्निशामक दलाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत तणसीचे ढीग पूर्णतः जळून खाक झाले होते. जनावरांचा चारा पूर्णपणे जळून खाक झाला असल्याने सदर शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.