चंद्रपूर : निवडणुकांमधील सुव्यवस्था आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी प्रशासनाची चांगलीत कसरत सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे सर्वत्र धावाधाव दिसत आहे. निवडणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस मिळून १३ हजार ३३४ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ गुंतविण्यात आले आहे.अधिकारी व कर्मचारी मिळून ९ हजार ८३४ मनुष्यबळाचा समावेश आहे. तर कायदा व सुव्यवस्थेसाठी ४ हजार ५०० पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकांतील मतपेट्या आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी १८४ बसेस, ५० मिनीबसेस, ४०० जिपगाड्या व २० ट्रक अशा मिळून ६५४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.यातही गरज पडलीच तर आवश्यकतेप्रमाणे खासगी वाहनेसुद्धा भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत.निवडणूक कामासंदर्भातील माहिती देण्यासाठी मंगळवारी दुपारी जिल्ह्याधिकाऱ्याननी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे, नोडल आॅफिसर (खर्च) संतोष कंदेवार उपस्थित होते.सहाही मतदार संघात मिळून १७ लाख ५९ हजार १४६ मतदार आहेत. २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुरवणी यादीमध्ये ८ हजार २५३ मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ९२.२६ टक्के मतदारांना फोटो ओळखपत्र देण्यात आले आहेत.गैरहजर, स्थलांतरीत व मृत मतदाराची वेगळ्याने नोंद घेण्याच्या सूचना आयोगाने दिल्याने ते काम सुरु आहे. निवडणूक कर्तव्यावरील सर्वांना टपाली मत पत्रिका देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ६१ लाख ९० हजाराची रक्कम जप्त करण्यात आली असून चार दारूची दुकाने सिल करण्यात आली आहेत.तर पाच दुकानांना निलंबीत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा प्रशानाने सुरू केलेल्या टोल फ्रि क्रमांकावर २०० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सोडविण्यात आल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
निवडणुकीच्या कर्तव्यावर १३ हजार ३३४ कर्मचारी
By admin | Updated: October 7, 2014 23:31 IST