अमडापूर : गावात वरली-मटका गुटखा, दारु व जुगार अड्डे आदी अवैध धंदे जोमात सुरु आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी अवैध धंदे बंद करण्याचा ठराव १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये घेतला. शिवाय यासंदर्भात मागणीचे निवेदन पोलीस स्टेशनला दिले. अमडापूर येथील बसस्थानकासमोर परिसरात तसेच इंदिरानगर, आठवडी बाजार, प्रा. शाळेसमोर दारु, वरली-मटका, गुटखा विक्री, जुगार अड्डे यांसारखे अवैधधंदे जोमात सुरु असल्याने सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास होत आहे. तसेच या दारुड्यांमुळे रस्त्याने जाणे -येणे कठीण आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणी दारुड्यांमुळे नेहमी भांडण होत असल्यामुळे सामाजिक शांतता भंग होत आहे. घरातील कर्ता पुरुष, व्यसनाधिन झालेले घरात रोज भांडण वादविवाद होतात. त्यामुळे गावातील कित्येकाचे संसार उद्ध्वस्त होऊन राखरांगोळी होत आहे. शिवाय गावातील काही शाळकरी मुले वरली-मटक्याच्या नादी लागले आहे.गावातील हे चित्र बदलण्यासाठी महिलांनी पुढाकार घेत, गावात सुरु असलेले अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी निवेदनातून केली. या निवेदनात अनसूया इरतकर, रूक्मिणी जुमडे, शीला माळोदे, आशा इंगळे, इंदु रामदास काळे, शोभा लोखंडे, अलका वानखेडे, इंदु लोखंडे यांच्यासह पन्नास महिलांनी ठाणेदार अमडापूर यांच्या स्वाक्षऱ्या असून, अवैध धंदे करणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी केली आहे.
अवैध धंदे बंद करण्यासाठी महिला सरसावल्या
By admin | Updated: May 1, 2017 23:27 IST