खामगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त खामगाव येथील सराफा बाजार तेजीत आला असून, सोन्याच्या खरेदीला झळाळी मिळाली आहे, त्यामुळे सराफा व्यावसायिकांना नोटबंदीनंतर प्रथमच अच्छे दिन आले असल्याचे दिसून येते.चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या खामगावला येथील चांदी उद्योगामुळे ‘रजतनगरी’अशी ओळख प्राप्त झालेली आहे. येथील चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी दूरदुरुन ग्राहक येत असतात. त्यामुळे जिल्ह्यात सराफा व्यवसायासाठी खामगावला महत्त्व दिले जाते. खामगावात सोन्या-चांदीचे दागिने व अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु नोटबंदीनंतर चलन तुटवडा जाणवू लागल्यापासून सराफा बाजारावर मंदीचे सावट पसरले होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केली; पण ही खरेदी सरासरीपेक्षा अधिक नव्हती. त्यामुळे सराफा व्यवसायात खऱ्या अर्थाने तेजी आलीच नाही; मात्र अक्षय्य तृतीयेला खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसून येत असून, बऱ्याच जणांनी अॅडव्हान्स बुकींगही केलेली आहे. हवे असलेले दागिने अक्षय्य तृतियेच्या दिवशीच मिळावेत, अशी त्यांची मागणी असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे किंवा सोन्याचे दागिने भेट म्हणून दिल्यास ते अक्षय्य म्हणजेच कधीही संपत नाहीत, अशी कल्पना आहे. शिवाय या दिवशी कोणताही मुहूर्त पहावा लागत नाही. त्यामुळे किरकोळ खरेदी करणारे ग्राहक थेट सराफा दुकानात येऊन दागिने खरेदी करतात; मात्र लग्नसराईचे दिवस असल्याने बहुतेक ग्राहक मोठ्या आकाराचे दागिने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिळावेत म्हणून आधीच बुकींग करून ठेवतात. त्यामुळे सराफा बाजारात लगबग सुरु झाल्याचे दिसून येते. दरम्यान, नोटाबंदीनंतर थंडावलेल्या सराफा बाजाराने गुढीपाडव्याला काही अंशी उचल खाल्ल्याचे चित्र होते; मात्र पाडव्याला सरासरी बाजार झाल्यानंतरही अक्षय्य तृतीयेला चांगला व्यवसाय होण्याची सराफा व्यावसायिकांना अपेक्षा आहे. डिजिटल पेमेंटकडे वाढला कलनोटाबंदीनंतर चलन तुटवडा निर्माण झाल्याने ग्राहकांचा डिजिटल पेमेंटकडे कल वाढला आहे. अनेक ग्राहक स्वाईप कार्डद्वारे तसेच चेकद्वारे पेमेंट करीत असल्याची माहिती येथील नवलचंद मिठूलाल ज्वेलर्सचे संचालक शहा यांनी दिली.
अक्षय्य तृतीयेमुळे सोन्याला झळाळी!
By admin | Updated: April 27, 2017 00:10 IST