खा.सुळे जिल्हा दौऱ्यावर आल्या असता भाजयुमोच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. आरोग्य विभागातील गट क व गट ड च्या ६००० जागांसाठी २५ व २६ सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थ्यांकडून ५२० रुपये परीक्षा शुल्क तर आरक्षित प्रवर्गातून २७० रुपये प्रती अर्ज वसूल करण्यात आलेले आहे. याचाच अर्थ कंपनीने अर्ज भरलेल्या लाखो परीक्षार्थ्यांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केलेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करताना ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्यानंतर तत्काळ मान्य न करता २४ तासांनी मान्य केल्याचे दिसत होते. काही प्रकरणांमध्ये २४ तासांनी सुद्धा शुल्क मान्य केल्याचे दिसून आले नाही; मात्र, खात्यातून पैसे कापले गेले. त्यामुळे काही परीक्षार्थींना नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागले. अशा प्रकरणांमध्ये कोट्यवधी रुपये कंपनीने अतिरिक्त वसूल केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परीक्षार्थींना दूरचे परीक्षा केंद्र दिलेले असल्याने परीक्षार्थींना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागले आहे. २४ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता या परीक्षा आरोग्य विभागाने रद्द केल्या. परीक्षार्थींना त्यांचे भरलेले परीक्षा शुल्क, परीक्षेसाठी गेलेल्या प्रवासाचे भाडे व झालेल्या खर्चापोटी प्रती परीक्षार्थी १० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी सुद्धा भाजयुमो चिखलीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संतोष काळे पाटील, पंजाबराव देशमुख, सागर पुरोहित, शिवाजी वाघ, भारत सोळंकी, कय्युम शाह, दीपक भाकडे, संदीप लोखंडे, सचिन गरड, नाना जोशी, शिवराज साप्ते, सिद्धेश्वर मोरे, कैलास घाडगे, आदिनाथ जाधव, आकाश काळे व इतरांची उपस्थिती होती.
ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याप्रकरणी कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST