खामगाव: नगरपालिका इमारतीनजीक आणि शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता-सुटत नसल्याचे चित्र दिसून आहे. गेल्या पाच वर्षांपासून तयार अवस्थेत असलेल्या या व्यापारी संकुलाच्या लिलावाची प्रक्रिया रखडली असून, निर्मितीपासूनच ‘विरोधी’ पक्षाच्या रडारवर हे व्यापारी संकुल सापडले आहे. याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव शहरात नगरपालिका प्रशासनाच्यावतीने केंद्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली. खामगाव नगरपालिकेच्या अद्ययावत प्रशासकीय वास्तुला लागूनच पालिकेचे व्यापारी संकुल उभारण्यात आले. आयडीएसएमटी योजनेंतर्गत सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत मंजुरी मिळालेल्या या संकुलातील २९ गाळ्यांचे बांधकाम सन २०१२-१३ मध्ये पुर्णत्वास आले. त्याचवेळी संबंधित कंत्राटदाराकडून या व्यापारी संकुलाचे पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले; मात्र या व्यापारी संकुलाच्या लिलावाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या या व्यापारी संकुलाचा लिलाव रखडला आहे. या व्यापारी संकुलावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आलटून-पालटून राजकीय ‘खेळ’ रंगत आहे. त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, लक्षावधी रुपयांच्या कराचेही नुकसान होत असल्याची वस्तुस्थिती आहे. याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोट्यवधींचा खर्च!खामगाव नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा एक भाग म्हणून २९ गाळे असलेल्या व्यापारी संकुलाची निर्मिती करण्यात आली; मात्र गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी सुंकलाच्या लिलावाचे ग्रहण सुटत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या व्यापारी संकुलाच्या निर्मितीसाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विरोधासाठी राजकारण!व्यापारी संकुलाच्या निर्मितीपासूनच विरोधी पक्षाकडून या व्यापारी संकुलाला लक्ष्य केले जात आहे. पालिकेत नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर २८ फेब्रुवारी २०१७ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक २७ नुसार व्यापारी संकुलाचा विषय सभेसमोर ठेवण्यात आला; मात्र विरोधकांनी या विषयाला आक्षेप नोंदविला. उल्लेखनीय म्हणजे या आधी सत्तेवर असलेल्या सध्याच्या विरोधकांनीसुद्धा दोन वर्षांपर्वी व्यापारी संकुल हर्रासीचा ठराव मांडला होता. त्यावेळी आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. नुकसानात भर!व्यापारी संकुलातील २९ गाळ्यांचा लिलाव लालफितशाहीत रखडला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून या व्यापारी संकुलापासून मिळणाऱ्या भाड्यापोटी आणि करापोटीच्या उत्पन्नापासून पालिकेला वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भाड्याचे नुकसान झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.
पालिकेच्या व्यापारी संकुलाचे ग्रहण सुटता सुटेना!
By admin | Updated: April 26, 2017 00:59 IST