चिखलगाव (अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून येथील एका शेतकर्याने नजीकच्या जलालाबाद शिवारातील पाझर तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील सुरेश शालीग्राम काकड (४0) हे त्यांचे वडील शालीग्राम जयराम काकड यांची पाच एकर शेती वाहतात. शालीग्राम काकड यांनी यावर्षी शेतावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज काढले व ते सुरेश यांना दिले. यावर्षी नापिकीमुळे हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेले सुरेश हे मंगळवार, १३ जानेवारी रोजी घरातून बाहेर पडले. रात्र झाल्यावरही सुरेश घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर बुधवारी सकाळी जलालाबाद शिवारातील पाझर तलावाजवळ त्यांची सायकल, कपडे व चप्पल आढळून आली. येथील विष्णू वाघमारे, अशोक डाखोरे, भगवान कवारे, संतोष वाघमारे आदी लोकांनी तलावात शोध घेतला असता त्यांना सुरेश यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बाश्रीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात पाठविला. मृतक सुरेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. ठाणेदार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बाश्रीटाकळी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चिखलगाव येथे शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: January 14, 2015 23:53 IST