ऑनलाइन लोकमतचिखली (बुलडाणा), दि. 3 - तालुक्यातील कवठळ येथील एका ४५ वर्षिय शेतमजुराने कर्जबाजारीपणाला कंटाळून २ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. कवठळ येथील बबन गणपत शेवाळे (वय ४५ वर्षे) यांच्याकडे स्वत:ची शेती नसल्याने ते गावातीलच रतन निंबोरे यांची १२ एकर शेती लागवडीने करत होते. यासाठी त्यांनी सुमारे दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज घेतले होते. मात्र, शेतीतून अपेक्षीत उपन्न न झाल्याने त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले व साधा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. त्यातच त्यांना पाच मुली असून दोघींचे लग्न झालेले आहे. अशा स्थितीत मुलींचे लग्न, कुटूंबाचा खर्च व घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून हतबल ठरलेल्या बबन शेळके यांनी २ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास गावातील लक्ष्मीबाई विठोबा राऊत यांच्या शेताताील उंबराच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पंचनामाअंती त्यांचा मृतदेह स्थानिक ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. मृतक शेतकरी बबन शेळके यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली असा परिवार आहे. (तालुका प्रतिनिधी)
कर्जबाजारी शेतमजुराची गळफास लावून आत्महत्या
By admin | Updated: January 3, 2017 20:08 IST