किशोर मापारी - लोणार धान्य घोटाळ्याने प्रसिद्धीच्या झोतात राहत असलेल्या तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था अद्यापही सुधरायला तयार नाही. धान्य बेपत्ता होत असून, तालुक्यातील दुकानांना जोडलेल्या गावांमध्ये कधी धान्य वितरण होते, हा संशोधनाचा विषय आहे. गत दोन वर्षांपासून तालुक्यातून साखर हद्दपार झाल्याचे दिसून येते. या प्रकारावर कुणाचाही अंकुश नसल्याने गोरगरीब धान्यापासून वंचित राहात आहेत.तालुक्यात ३३ हजार ३१४ रेशन कार्डधारक आहे. या रेशनकार्डधारकांना ९६ दुकानांमधून स्वस्त धान्याची वितरण प्रणाली आहे. यामध्ये एपीएल शेतकरी ७५९१, एपीएल प्राधान्य ५७१८, बीपीएल ९६२०, अंत्योदय ६४२७, स्पेशल एपीएल ३६४१, शुभ्र १९३ आणि अन्नपूर्णा १२४ रेशनकार्डधारक आहेत. एपीएल शेतकरी, एपीएल प्राधान्य रेशनकार्डधारकांना गहू , तांदूळ तर बीपीएल व अंत्योदयधारकांना गहू, तांदूळ, साखर वाटप करणे बंधनकारक असताना कधी गहू तर कधी तांदूळ यावरच रेशनकार्डधारकांना भागवावे लागत आहे. यामध्ये साखर तर हद्दपारच झाली आहे. धान्य वितरण प्रणालीमध्ये सुधारणा केली असली तरी त्यामध्येही थोडेफार धान्य गावात पाठविले जाते आणि इतर धान्य काळ्या बाजारात विकले जाते. नेमके धान्य वितरणासाठी कधी येते आणि कोण वितरित करतो, हे कळत नाही. धान्य वितरणासाठी आल्यानंतर ग्रामपंचायतला सूचना देऊन दवंडी देणे गरजेचे आहे किंवा काही नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविणे गरजेचे आहे; मात्र असा कोणताही प्रकार होत नाही. दुपारच्या वेळी मजूर आणि शेतकरी शेतात गेल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार धान्य घेऊन येतात आणि वितरण केल्याचा देखावा करतात. याबाबत अनेकांनी तहसील व पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु कोणतीही उपाययोजना झालेली नाही. जि. प. व पं.स. निवडणुकी दरम्यान अधिकारी वर्ग निवडणुकीत गुंतला असताना तालुक्यातील ९० टक्के दुकानदारांनी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोरगुरबांचा तोंडचा घास काळ्या बाजारात नेऊन विकला आहे. यामध्ये लोणार गोदाम पालक यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केली आहे. अन्न धान्य घेण्यासाठी गेलेल्या अनेकांना माल आलाच नाही, अशी भूलथाप दुकानदाराकडून दिली जाते. यामध्ये तालुक्यातील अधिकारी यांचे संगनमत असल्यामुळे कोणत्याही दुकानदारांवर कारवाई केल्या जात नाही. ‘ना खाऊंगा ना खाणे दूंगा’ असे ब्रीद वाक्य विद्यमान सरकारचे असतानाही हा घोटाळा थांबवावा, अशी मागणी राजेश मापारी यांनी अन्न पुरवठा ग्राहक सरंक्षण मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. गोरगरिबांना अन्न मिळावे, यासाठी योजना सुरु केल्या आहेत; परंतु काही अधिकारी आर्थिक हितासाठी योजनेला तिलांजली देत असून, गरिबांच्या तोंडचा घास हिसकावून घेत आहेत. रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य मिळालेच पाहिजे.- राजेश मापारी, जि.प.सदस्य, लोणार.धान्य वितरणमध्ये घोटाळा झाल्याबाबत कोणतीही कल्पना नाही. सदर तक्रारीबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.- ए. एफ. सय्यद , पुरवठा निरीक्षण अधिकारी,लोणार.
स्वस्त धान्य दुकानातून दोन वर्षांपासून साखर गायब!
By admin | Updated: April 18, 2017 00:55 IST