लोणार : शहरातील सांडपाणी थांबविण्यासाठी सरोवर काठावर उभारलेल्या सांडपाणी प्रकल्पाच्या निकृष्ट कामामुळे दुरावस्था झाली आहे. जोपर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम चांगले होत नाही तोपर्यंत सदर प्रकल्प हस्तांतरण करुन घेण्यास नगर पालीकेने असर्मथता दर्शविली आहे.
संपूर्ण जगातील संशोधकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणार्या येथील वैशिष्टपूर्ण खार्या पाण्याच्या सरोवरात जाणारे शहरातील सांडपाणी अडकविण्यासाठी नगर पालीकेच्या वतीने १५ वर्षापूर्वी ३६ लक्ष रुपये खर्च करुन नबीच्या खड्डयाजवळ दगडी भिंत बांधली. मात्र या भिंतीचा काहीही उपयोग झाला नाही. दगडी भिंत बांधल्यानंतरही शहरातील घाण सांडपाण्यासह सरोवरात जाऊ लागली. त्यामुळे सरोवराच्या खार्या पाण्यात असलेल्या अतिशय दुर्मिळ जैवविविधता जिवाणू यांचे अस्तीत्व धोक्यात आले. खार्या पाण्याचे रुपांतर गोड्या पाण्यात होऊ लागले. विविध विषयावरील संशोधनासाठी महत्वपूर्ण असलेले विवरातील खार्या पाण्याचे वैशिष्ट यामुळे नष्ट होत चालल्याची भिती जगभरातील संशोधकांनी व्यक्त केल्यानंतर राज्यातील काही विज्ञान प्रेमिंनी निसर्गाचा अद्भूत ठेवा असलेल्या लोणार सरोवराच्या जतन आणि खंडपिठात जनहित याचीका दाखल करुन यासाठी न्यायालयास हस्तक्षेप करण्याची विनंती केली. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी विकास आराखडा तयार केला. त्यानुसार सरोवरात जाणारे शहरातील घाण पाणी रोखण्यासाठी १ कोटी २५ लक्ष रुपये निधी मंजुर केला. यासाठी शासनाने निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीकी संशोधन संस्था नागपूर) यांच्याकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा तयार करुन प्रकल्पाचे काम सुरु केल्यापासून वर्षभरात पुर्ण करायचे होते. मात्र तीन वर्ष होऊनही काम अजुनही अपूर्ण थंबस्त्यात आहे. शहरातून वाहणार्या सांडपाण्याच्या क्षमतेच्या तुलनेत कमी क्षमता असलेला प्रकल्प बांधून संबंधित ठेकेदाराने शासनाची दिशाभुल केली आहे. सदर प्रकल्पाचे बांधकाम करतांना निरिने तसेच ठेकेदाराने भविष्यात शहराच्या वाढणार्या लोकसंखेच्या तुलनेत वापरात येणारे पाणी आणि पावसाळ्यात शहरातील नाल्यांमधून वाहणारे पाणी याचा कोणताही विचार न करता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लोणारकरांच्या आणि शासनाच्या माथी मारला आहे.