कोरोना काळात लावलेले निर्बंध नागरिक आणि व्यापारी पायदळी तुडवित आहेत. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. अनेकांनी दुकाने उघडलीच आणि त्यावर पोलिसांनी कारवाई केली. परंतु यामध्ये काही राजकीय व्यक्ती हस्तक्षेप करून कारवाई अडथळा निर्माण करतात. त्यामुळे संतप्त झालेले ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शेवटचा अल्टिमेट दिला आहे. सरकारने दिलेले नियम सर्वांना पाळणे बंधनकारक आहेत. यापुढे कोणतेही दुकान उघडे दिसल्यास मी कारवाईला बांधील आहे, असा स्पष्ट इशारा आटोळे यांनी दिला. दुकान उघडण्यावरून अनेक वाद झाले आहेत. पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर दबाव येतो, अशा परिस्थितीत निर्बंध अमलात कसे येतील, असा प्रश्न आहे. तीन दिवसांपूर्वी झालेली ही बैठक चांगलीच गाजली आहे. सरकारी नियमांचे पालन व्हावे, कोरोनाचा धोका वाढू नये, या उद्देशाने आडोळे यांनी हा निर्णय घेतला होता. दरम्यान, बैठक झाल्यापासून व्यापारी, नागरिकांनी सहकार्य केल्याचे ठाणेदार आडोले यांनी सांगितले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यास कायद्याची अंमलबजावणी नीट होऊ शकते, हेच यावरून दिसून येते. ३० एप्रिलपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार आडोळे यांनी केले आहे.
साखरखेर्डा पोलिसांचा व्यापाऱ्यांना अल्टिमेटम ! - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST