ब्रम्हानंद जाधव/मेहकर : गतवर्षीपासून राज्य शासनाने भावी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. यावर्षी राज्यभरातून ४ लाख १४ हजार ८१५ भावी शिक्षकांनी ही परीक्षा दिली. यामुळे शासनाला सुमारे १७ कोटी ६५ लाख ६७ हजारच्या जवळपास महसूल मिळाला आहे.भावी शिक्षकांसाठी शासनाने सीईटी ही सामाईक प्रवेश परीक्षा लागू केली. सन २0१0 मध्ये शिक्षकांच्या १५ हजार १२ जागांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दज्रेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भावी शिक्षकांची पुन्हा चाळणी करण्यास सुरूवात केली. त्यासाठी टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा सन २0१३ पासून सुरु करण्यात आली. गतवर्षी सुमारे ६ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा दिली होती. यावर्षी १४ डिसेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये राज्यातून ४ लाख १४ हजार ८१५ भावी शिक्षकांनी ही परीक्षा दिली. टीईटीच्या नावाखाली राज्यभरातून ४ लाख १४ हजार ८१५ भावी शिक्षकांकडून तब्बल १७ कोटी ६५ लाख ६७ हजार ७00 रुपये शासनाने जमा केले आहेत. राज्यभरातून पहिली ते पाचवी गटासाठी असलेला प्रथम पेपर २ लाख ६0 हजार ६१६ विद्यार्थ्यांनी दिला. त्यामध्ये जवळपास १३ कोटी ३ लाख ८ हजार रुपये शासनाकडे जमा झाले. सहावी ते आठवी या गटातील द्वितीय पेपर देणार्या १ लाख ५४ हजार १९९ विद्यार्थ्यांकडून ४ कोटी ६२ लाख ५९ हजार ७00 रुपये जमा झाले आहेत. भावी शिक्षकांकरीता शासन वेळोवेळी परीक्षा काढत असून शिक्षक भर्ती करण्याचे कुठलेच संकेत मात्र देत नाही. त्यामुळे तिव्र असंतोष व्यक्त होत आहे.
टीईटीमुळे शासनाला मिळाला १७ कोटी ६५ लाखाचा महसूल !
By admin | Updated: December 22, 2014 23:43 IST