सुलतानपूर : येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात १ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गजानन भानापुरे होते. दरम्यान, ग्रामसभेच्या विविध विषयांचे वाचन ग्रामविकास अधिकारी मोतीराम डव्हळे करीत असताना सुलतानपुरातील रणरागिणी ग्रामसभेस मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या व गावात दारुच्या दुकानास मान्यता न देण्याची मागणी लावून धरली, तसे लेखी निवेदनसुद्धा प्रशासनाकडे दिले. सुलतानपुरात कुठल्याच अमली पदार्थात देशी-विदेशी दारुच्या दुकानास परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी गावातील रेणुका हरकाळ, विद्या गवई, उर्मिला लाहोटी, गयाबाई सरदार, शारदा लाहोटी, किरण पनाड, रंजना पनाड, पुष्पा झंवर, अकीलाबी, आशालता जावळे, जिजाबाई पनाड, निर्मला इंगळे, स्वाती जोशी, सुनीता शिराळे, सुलतानाबी, अनुसया नालींदे यांच्यासह जवळपास नव्वद महिलांनी ग्रामसभेत केली. शिवाय आपल्या मागणीचे निवेदन ग्रामसभेत वाचून दाखविण्यात आले. दारुविक्रीबाबत किंवा नवीन दारुचे दुकान मिळणेबाबत मागणी असलेला अर्ज यापुढे ग्रामपंचायतीस प्राप्त झाल्यास गावात दवंडी देऊन प्रसिद्धी करुन सदर विषय ग्रामसभेत घेण्यात येईल, हा ठराव मंजूर करण्यात आला.
दारुबंदीसाठी एकवटल्या रणरागिणी!
By admin | Updated: May 2, 2017 23:47 IST