लोणार : पावसाची चातकासारखी वाट पाहत असलेल्या शेतकर्यांना शहरात दुपारी झालेल्या पावसाने दिलासा दिला. शहरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. गत महिन्याभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसामुळे शेतकरी हैरान झाले होते. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी जाणारे तालुक्यातील शेकडो शेतकरी यावेळी चिंतेत होते. महिन्याभरापासून पाऊसच पडला नसल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. वेळीच वरुणराजा बरसला असता तर पेरण्या पार पडल्या असत्या. बहरलेली हिरवी शेती पाहून शेतकर्यांना आनंदात वारी करणे शक्य झाले असते; मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तालुक्यातील असंख्य शेतकर्यांनी पांडुरंगाला पाण्यासाठी साकडे घालत यंदा आषाढीच्या दिवशी पांडुरंगाला दुरुनच हात जोडले; मात्र पांडुरंगानेही शेतकर्यांनी घातलेल्या विनवणीला साथ देत आज चौफेर मृगधारा बरसल्या. महिनाभरापासून तहानलेले रान ओलेचिंब झाले आणि बळीराजाच्या चेहर्यावर आनंद फुलला.
लोणारात पावसाची हजेरी
By admin | Updated: July 8, 2014 23:24 IST