चिखली : जिल्ह्यातील अनेक गावांनो तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने अनेक ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्यासाठी मार्च महिन्यापासून सादर केलेला प्रस्ताव तब्बल दीड महिना उलटूनही महसूल विभागाने मंजूर केला नसल्याची बाब आमदार राहुल बोंद्रे व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निदर्शनास आली़ याप्रकरणी उभय आमदारांनी जिल्हाधिकारी झाडे यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरल्याचे भासविण्यासाठी एक महिना उशिराने पाणीटंचाईग्रस्त गावांचे टँकरचे प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवा, असे फर्मान शासनाच्यावतीने देण्यात आल्याचा आरोप आमदारद्वयांनी केला आहे.याबाबत सविस्तर असे की, बुलडाणा तालुक्यातील गिरडा, दत्तपूर, रायपूर, हनवतखेड, चौथा, गोंधनखेड, देउळघाट, माळविहीर, जांब, शिरपूर व चिखली तालुक्यातील भोगावती, सैलानी नगर, डोंगरशेवली, कोलारा या गावात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे ग्रामपंचायतीने गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा होण्याकरिता विहित नमुन्यात प्रस्ताव मार्च महिन्यामध्ये शासनाकडे सादर केला होता़ मात्र राज्य शासन राबवित असलेली जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी दाखविण्याकरिता टँकरचे प्रस्ताव एक महिना उशिराने पाठवावे, असे फर्मान महसूल विभागाच्यावतीने सोडण्यात आल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची बाब आमदार राहुल बोंद्रे व अमदार हषर्वधन सपकाळ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी झाडे यांना याप्रकरणी चांगलेच धारेवर धरले व शासन राबवित असलेले जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात खरी माहिती जनतेला व शासनाला द्या, अशा सूचना करीत उपरोक्त गावाचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करून घेतल्यामुळे उपरोक्त १४ गावांना टॅकरद्वारे लवकरच पाणीपुरवठा सुरू होणार आहे़ यावेळी जि.प. सदस्य जयश्री शेळके, काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष सुनील तायडे, अॅड़ शरद राखोंडे, दिलीप जाधव, अनिल वारे, पं.स.उपसभापती रसुल खान, अमिनखॉ उस्मानखॉ व संबंधित गावचे सरपंच उपस्थित होते़
पाणीटंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव पाठविले उशिरा
By admin | Updated: April 15, 2017 00:21 IST