बिबी : येथील विजेच्या तारा लाेंबकळल्या असून अनेक ठिकाणचे विद्युत खांब जीर्ण झाले आहे़ त्यामुळे, लाेंबकळलेले तार दुरुस्त करून जीर्ण खांब बदलण्याची मागणी बिबी ग्रामपंचायतच्या वतीने महावितरणला दिलेल्या निवेदनात केली आहे़
बिबी गाव नागपूर ते मुंबई महामार्गावर आहे़ लोणार तालुक्यातील उपबाजार समितीचे गाव असून येथे मोठ्या प्रमाणात परिसरातील गावातील लोकांची गर्दी असते.
गावात जिल्हा परिषद शाळा, कॉलेज, अंगणवाड्या, ग्रामीण रुग्णालय अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणी अनेक वर्षापासून वेळोवेळी तक्रारी देऊनही जिवंत विद्युत तारा व काही ठिकाणचे जीर्ण होऊन मोडकळीस आलेल्या पोलमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे़ त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही तारांची दुरुस्ती झालेली नाही. या अगोदरही अनेकांना विद्युत तारांचा शॉक लागून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच बिबी येथे अनेक वर्षापासून आदिवासी पारधी वस्ती असून अनेक आदिवासी कुटुंबाच्या घरात अंधार आहे . काही विद्युत कनेक्शन मिळण्याच्या प्रतीक्षेची अनेक वर्षापासून वाट पाहत असून महावितरणने सवलतीच्या दरात पारधी आदिवासी वस्तीत लाईटची व्यवस्था करून विद्युत मीटर देण्याची मागणी महावितरण अभियंता यांच्याकडे बिबी ग्रामपंचायत सरपंच चंदाबाई गुलमोहर यांनी केली आहे. महावितरण अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन गावातील जीर्ण झालेले विद्युत खांब व लाेंबकळलेले तार दुरुस्त करण्याची मागणी निवेदनात केली आहे़ यावेळी भास्कर खुळे (उपसरपंच), दीपक गुलमोहर, अमोल मुळे, विठ्ठल देवकर, गजानन काकडे, सदस्य उपस्थित होते.
बिबी गावातील तार लाेंबकळलेले असल्याची तक्रार ग्रामपंचायतकडून मिळाली आहे़ त्याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून लवकरच दुरुस्तीचे काम करण्यात येईल.
एस. बी. चव्हाण, सहाय्यक अभियंता बिबी