बुलडाणा : खरीप हंगाम तोंडावर आला असून, या हंगामाकरिता शेतकर्यांना पीक कर्ज वाटप शक्य तेवढय़ा लवकर पूर्ण करावयाचे आहे. सर्व बँकांनी त्यांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे लवकर पीक कर्ज वाटप करावे याबाबत हयगय व दिरंगाई केल्यास संबंधित बँकेवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये कडक कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यात केवळ १९१ कोटीचे पीक कर्ज वाटप झाले असून, हे एकूण उद्दिष्टाच्या १७ टक्के आहे. ही गती अतिशय संथ असून, याबाबत जिल्हाधिकारी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, उमेशचंद्र हुसे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शेंडे आदींची उपस्थिती होती. खरीप पीक कर्जाच्या उद्दिष्टापैकी वितरित करण्यात येणार्या कर्जाच्या कार्यवाहीविषयी जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त करीत शासनाने पारित केलेल्या आदेशानुसार सर्व बँकांनी १५ जूनपर्यंंत सर्व पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येऊन नवीन पीक कर्ज वाटप करावे. काही राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांचे शाखधिकार्यांनी त्यांच्या शाखेत येणार्या शेतकर्यांशी अरेरावीची भाषा वापरू नये. तसेच शेतकर्यांच्या बचत खात्यामधील रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात बँकांनी परस्पर वळवू नये, असेही त्यांनी सांगितले.
पीक कर्जवाटपात दिरंगाई केल्यास गुन्हा
By admin | Updated: June 9, 2015 00:37 IST