खामगाव : गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयकडून रोकडच मिळालेली नाही. त्यामुळे बँकांमध्ये तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, अनेक एटीएमचे शटर डाउन झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.नोटबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यातून बँका सावरत असतानाच आरबीआयकडून रोख रक्कम मिळणे अनियमित झाले आहे. त्यामुळे बँकांना दैनंदिन व्यवहार करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मागील चार दिवसांपासून आरबीआयकडून रोकड मिळाली नसल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने दिली. पैसे काढायला आलेल्या ग्राहकांना देण्यासाठी बँकांकडे पैसा नाही. त्यामुळे जेवढे पैसे जमा झाले, तेवढेच वाटप केले जात आहेत. परिणामी खात्यात पैसे जमा असूनही ग्राहकांना कमी पैसे दिले जात आहेत. तसेच एटीएममध्ये रक्कम टाकणे अनेक बँकांनी बंद केले असून, एटीएम केंद्रांचे शटर लावून कुलूप ठोकण्यात आले आहे. केवळ आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा निवडक बँकांच्या एटीएममध्ये रक्कम टाकली जात आहे; परंतु तेथेही गर्दी होत असल्याने तास-दोन तासात पैसे संपून जातात. पैशांची निकड असलेले अनेक ग्राहक संध्याकाळी या एटीएमवरून त्या एटीएमवर चकरा मारताना दिसतात. पण, त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. एकंदरित तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक ‘एटीएम’चे शटर डाउन!
By admin | Updated: April 18, 2017 01:05 IST