मेहकर (जि. बुलडाणा): पावसाच्या हुलकावणीमूळे यावर्षी खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. पावसाअभावी होणार्या पीक नुकसानीची भरपाई मिळावी याकरीता राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा उतरविण्यासाठी ३१ जुलै रोजी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शेतकर्यांची तारांबळ उडाली होती. दरम्यान तालुक्यातील हजारो शेतकर्यांचा पीक विमा उतरविणे अद्यापही बाकीच आहे. तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात दोन ते तीन पाऊस झाल्यानंतर पावसाने लंबी दडी दिली. पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप पीक करपायला लागली आहेत. अनियमित पावसामुळे होणार्या पीक नुकसानीची भरपाई मिळावी याकरीता तालुक्यातील शेतकर्यांनी राष्ट्रीय कृषि पीक विमा योजनेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. या योजनेचा विमा काढण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. त्यामुळे पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीयीकृत बँकामध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकर्यांची एकच गर्दी पाहावयास मिळाली. परंतू, मुदत संपल्याने यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले नाही. तालुक्यातील हजारो शेतकर्यांचा पीक विमा उतरविणे अद्याप बाकी असल्यामुळे शेतकरी राष्ट्रीय पीक विम्यापासून वंचित राहणार असल्याने पीक विम्याची तारीख वाढवून मिळावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे. गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ४१६ शेतकर्यांनी १ लाख २९ हजार ७0 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला होता. त्यासाठी ५ कोटी १५ लाख ३३ हजार रुपये हप्ता शेतकर्यांनी भरला. परंतू, पीक विम्याचा लाभ अद्यापपर्यंत अनेक शेतकर्यांना मिळाला नसल्याने शेतकर्यांना गतवर्षीच्या पीक विम्याची प्रतीक्षा लागली आहे.
पीक विमा भरण्यासाठी तारांबळ
By admin | Updated: July 31, 2015 00:08 IST