लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी व शेतकर्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने कोल्हापुरी बंधार्यांची निर्मिती शासनाकडून करण्यात आली; परंतु या बंधार्यात पाणी अडविले जात नसून, बहुतांश बंधार्यांमध्ये ठणठणाट आहे. त्यामुळे कोल्हापुरी बंधारे कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. सिंचन सुविधेत वाढ व्हावी, भूगर्भातील जलपातळी वाढावी, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खचरून कोल्हापुरी बंधार्यांची निर्मिती बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात केलेली आहे; परंतु आज रोजी बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यांमध्ये असलेल्या कोल्हापुरी बंधार्यांच्या स्थितीवर नजर टाकली असता, हे बंधारे कोरडेठण्ण पडलेले असून, कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात माहिती घेतली असता, अनेक बंधार्यांचे लोखंडी गेट चोरीस गेलेले आहेत. तर काही ठिकाणी गेटची तुटफूट झालेली आहे. त्यामुळे गेट लावूनही फायदा होत नाही. तसेच पावसाळ्यात बंधार्याचे गेट लावून घेण्याकडेसुद्धा संबंधितांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे बंधार्यांमध्ये ठणठणाट दिसून येतो.
पालकमंत्र्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष! जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी मागिल आठवड्यात अधिकार्यांची बैठक घेऊन त्यांना कोल्हापुरी बंधार्यात पाणी अडवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. यामध्ये बंधार्यांची उंची वाढवण्याचेसुद्धा त्यांनी सांगितले; परंतु पालकमंत्र्यांच्या या सूचनांकडेसुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. आज रोजी खामगाव तालुक्यासह घाटाखालील विविध तालुक्यांमधील कोल्हापुरी बंधार्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट दिसून येतो.