मेहकर (जि. बुलडाणा) : शहर व ग्रामीण भागात विजेचे रोहित्र उघडे राहत असल्याने नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे वीज कंपनीच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी विजेचे रोहित्र उघडेच राहत आहे. नगरपालिकेसमोर असलेले विजेचे रोहित्र नेहमीच उघडे राहते. हे रोहित्र जमिनीच्या अगदी काही फुटावर आहे. या ठिकाणी काही लघुव्यावसायिक आपली दुकाने थाटून बसतात. त्यांच्या जीवित्वास या रोहित्रामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा या रोहित्रामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीचा मोठा भडका होतो; परंतु या रोहित्राकडे वीज कंपनीच्या अधिकार्यांचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी अशाच प्रकारचे रोहित्र उघडे राहतात. या रोहित्रांना लोखंडाची पेटी असतानाही लाईमनच्या दुर्लक्षामुळे रोहित्र नेहमीच उघडे राहतात. अशीच स्थिती ग्रामीण भागातही आहे. ग्रामीण भागातही बहुतांश खेडेगावात रोहित्र उघडेच राहते. संबंधित अधिकार्यांसह लाईमनचेसुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते. अधिकार्यांच्या या हलगर्जीमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.
उघड्या रोहित्रामुळे नागरिकांचा जीव धोक्यात!
By admin | Updated: June 1, 2015 01:57 IST